Sanjay Raut Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut : 'हा तर भाजप अन् 'RSS'चा प्रोपगंडा'; संजय राऊत कडाडले

Pradeep Pendhare

Mumbai News : न्यायदेवताच्या डोळ्यावरची आणि हातातील तलवार काढण्याच्या निर्णयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत चांगलेच कडाडले.

"हा निर्णय म्हणजे, भाजप आणि 'RSS'चा प्रोपगंडा आहे. लोकांच्या मनात संविधानाविषयी जी भावना आहे, ती पुसून काढण्यासाठी, न्यायालयातील काही लोकांनी भाजपला मदत करण्याचे ठरवले दिसते", असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना न्यायदेवताच्या डोळ्यावरती काळी पट्टी आणि हातातील तलवार काढण्याच्या मुद्यावर चांगलेच संतापले होते. गेल्या दहा वर्षांपासून देशातील, राज्यातील विरोधी पक्षांना संपवले जात आहे. संविधान आणि कायद्याचा गैरवापर केला जात आहे, असा गंभीर आरोप केला.

संजय राऊत म्हणाले, "न्यायदेवताच्या हातातून तलवार काढली आहे. अन्याय, भ्रष्टाचार, बलात्कार, भ्रष्टाचार करणाऱ्यांना वाॅशिंग मशिनमध्ये टाकणाऱ्यांचे मुंडक उडवून टाकू, अशी ती रचना आहे. माझ्यासमोर किती मोठी व्यक्ती असू द्या, व्यक्ती किती मोठी, पदसिद्ध आहे, श्रीमंत आहे, शक्तिमान आहे, ते पाहून मी न्याय करणार नाही. न्याय हा समान आहे. तराजू आहे. पण या देशात गेल्या दहा वर्षात न्याय झाल्याचे पाहिले नाही". संविधानाचे रक्षण झाले नाही. संविधान वाचवण्यासाठी आम्हाला नारा द्यावा लागला. संविधान बदलण्याचे संपूर्ण कारस्थान रचण्यात आलं होते. या देशाच्या जनतेनं संविधान वाचवण्यासाठी मोदींचे बहुमत काढून टाकलं, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधलं.

गंभीर आरोप

लोकांच्या मनात संविधानाविषयी जी भावना आहे, ती पुसून काढण्यासाठी, न्यायालयातील काही लोकांनी भाजपला मदत करण्याचे ठरवले दिसते, असा गंभीर आरोप करत, अचानक डोळ्यावरती पट्टी काढून, उघड्या डोळ्याने भ्रष्टाचार पाहा, उघड्या डोळ्याने खून, बलात्कार, उघड्या डोळ्याने सर्वकाही चाललं आहे. मोदीजी, अमित शाह (Amit Shah), फडणवीस तेच करत आहेत. एकनाथ शिंदे देखील तेच करत आहे. त्यामुळे न्याय देवताच्या डोळ्यावरची पट्टी काढून टाकली आहे. हातातील तलवार काढून संविधान दिल्याकडेही संजय राऊत यांनी लक्ष वेधलं.

हा तर अजेंडा

'पण संविधानाच रक्षण, संविधानानुसार काम होत आहे का? त्यातील आम्ही सगळ्यात जास्त 'व्हिक्टिम' आहोत. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात संविधानविरोधी सरकार सुरू आहे. आणि ते घटनाबाह्य सरकार भ्रष्टाचार, अत्याचार करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीने त्यावर निर्णय घेण्यास हतबलता दाखवली. संविधानाच्या हातात का बरं पुस्तक देत आहात. तुमच्या समोर संविधान आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आहे, हे स्पष्ट असताना तुम्ही निर्णय देऊ शकला नाही. मोदी आणि शाह यांची तशी इच्छा नव्हती. संविधानावर कोणीतरी पाय ठेवला आहे. पुतळीच्या हातामध्ये संविधान देणे हा भाजप, 'RSS'चा अजेंडा आहे', असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

संविधानाचे रक्षक म्हणून काम करा

'हा तुम्ही (सर्वोच्च न्यायालय) प्रचार करत आहात, एका पक्षाचा. अगोदर संविधानाचे रक्षक म्हणून काम करा, ते तुम्ही करत नाहीत. ईव्हीएमच्या संदर्भात जनतेच्या लोकांच्या मनात भीती आहे. पण तुम्ही ईव्हीएमला क्लीन चिट दिली. लोकांच्या भावना समजली नाही. संविधानाचा, कायद्याचा गैरवापर करून विरोधी पक्षाला संपवलं जात आहे, आणि तुम्ही डोळे उघडे ठेवून पाहात आहात. त्यामुळे न्यायदेवताच्या हातात संविधान देणे, डोळ्यावरची पट्टी काढणे हा सर्व प्रोपगंडा आहे', असेही संजय राऊत यांनी म्हंटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT