MP Sanjay Raut  Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut : 'हरियाणात कोणत्या फॉर्म्युल्यानं जिंकले? भाजपनं 'तो' फॉर्म्युला जगभर शेअर करावा'

Pradeep Pendhare

Mumbai News : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हरियाणातील भाजपच्या विजयाचा फॉर्म्युला विचारला आहे. हा विजय म्हणजे, चमत्कार असून, विजयाचा फॉर्म्युला भाजपने जगभर शेअर करावा, असं आवाहन केले आहे.

"काँग्रेसची 13 टक्के मतं तिथं वाढली असून, फक्त सहा पाॅईंट मताच्या जोरावर भाजपने 30 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे हा विजयाचा फॉर्म्युला भाजपने शेअर केला पाहिजे", असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना हरियाणातील भाजपच्या (BJP) विजयाचं आणि काँग्रेसच्या पराभवाचं विश्लेषण केले. संजय राऊत म्हणाले, "हरियाणातील पराभवाचे पडसाद काँग्रेसमध्ये उमटत आहे. प्रत्येक पक्ष निवडणूक जिंकल्यावर आणि हरल्यावर निकालाचं चिंतन करतो. चिंतन जे आहे, ते भाजपने केले पाहिजे, आपण जिंकलो कसे? कोणता फॉर्म्युल्यानं जिंकलो? आणि हा कोणता फॉर्म्युला असेल, 'ईव्हीएम'चा असेल, तो जगभरात शेअर केला पाहिजे. आम्ही कसे जिंकलो, त्यावर भाजपने पुस्तक लिहिलं पाहिजे".

'हरियाणात काँग्रेस (Congress) पक्ष फक्त पाॅईंट सहानं पराभूत झाला आहे. पाॅईंट सहा, एक टक्का सुद्धा नाही. काँग्रेसची मते 13 टक्क्यांनी वाढली आहेत. पण आश्चर्य वाटतय, भाजपला पाॅईंट सहा मतं जास्त मिळाली आणि 30 जागा वाढल्या, हा चमत्कार झाला कसा? हा चमत्कार आहे. पाॅईंट सहा मतांमध्ये 30 जागा वाढू शकतात का? म्हणून, चिंता वाटते. राहुल गांधी यांनी 'ईव्हीएम' घोटाळ्याचे जे काही पुरावे दिले आहेत, त्याच्या गांभीर्याने विचार कोणी करायचा असेल, तर निवडणूक आयोग करणार नाही, तर तो जनतेने करावा', असे संजय राऊत यांनी म्हंटले.

'भाजप सत्ताधारी पक्ष ठरवत आहे, की निवडणुका कधी लावायच्या. सत्ताधारी पक्षच निवडणूक आयोगाला कार्यक्रम देतो, असं म्हणावं लागले. हरियाणाबरोबरच महाराष्ट्रातील निवडणुका व्हायला हव्या होत्या. परंतु सत्ताधारी पक्षांना सोयीचं नसल्यानं, पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात प्रचारासाठी वेळ नसल्यानं, त्यांना हरियाणा आणि जम्मू-काश्मीरला वेळ द्यायचा असल्याने भाजपच्या सूचनेनुसार त्यांनी महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकलल्या असतील', असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.

पंतप्रधान मोदींना दोनच काम

'देशाच्या पंतप्रधानांना दोनच काम आहे. त्यांना भरपूर वेळ असल्यावर ते विदेशात असतात, आणि विदेशातं नसतात, तेव्हा ते देशभरातील निवडणुकांच्या प्रचारात गुंतलेले असतात. दोन-चार दिवसांत आचारसंहिता लागेल, असे सांगितले जात असेल, तर आमचा त्यावर विश्वास आहे. कारण भाजपवाले सांगतील, तेच होणार आहे. फक्त 'ईव्हीएम' कोठे दाबून ठेवले आहे, गोडावूनला, बंद दाराआड काय झाकलं जात आहे, हे आम्हाला तपासावे लागेल', असेही संजय राऊत यांनी म्हंटले.

प्रेम नसून 'अफेअर' आहे

मंत्रिमंडळात अलबेल नाही, असे दिसते. यावर संजय राऊत म्हणाले, "त्यांचात कधीच अलबेल नव्हते. महायुती सरकार अघटीत सरकार बनवलं गेले. महाराष्ट्र कमजोर करायचा आहे, त्यासाठी राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली गेली. तीन पक्षामध्ये पहिल्या दिवसांपासून मारामाऱ्या आणि हणामाऱ्या सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांना कोणी विचारत नाही. मुख्यमंत्र्यांनी भाजप नेते अमित शाह यांचा पूर्ण ताबा घेतला आहे. पूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसचे नेते एस. के. पाटील होते, त्यांची ख्याती अशी होती, मुंबईतून ते दिल्लीला सर्वात जास्त पैसे द्यायचे. त्यासगळ्यांचा रेकॉर्ड मुख्यमंत्र्यांनी तोडला, असे दिसते. त्यामुळे अमित शाह फडणवीस पेक्षा सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात पडलेले दिसतात. पण हे प्रेम नसून अफेअर आहे, हे लक्षात घ्यावा".

पंतप्रधानांवर विश्वास ठेवला पाहिजे

न्यायालयाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. त्यात ही योजना राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटलं आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, "नक्कीच ही योजना राजकीय दृष्ट्या प्रेरित आहे. हे मुख्यमंत्र्यांचे नेते नरेंद्र मोदीच सांगतात. झारखंडमध्ये जी लाडकी बहीण योजना आहे. ती कशी भ्रष्ट, कुचकामी आहे, राजकीय दृष्टीने कशी प्रेरित आहे, हे जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, तेव्हा ती, योजना महाराष्ट्रात चालू आहे. म्हणजे, झारखंडला एक न्याय, महाराष्ट्राला दुसरा, असं होऊ शकत नाही. पंतप्रधानांवर विश्वास ठेवला पाहिजे".

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT