SIR Duty: निवडणूक आयोगाचं विशेष मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम (SIR)सुरु केला आहे. मोहिमेसाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर नियुक्त करण्यात आल्याने राज्यातील शाळांमधील अध्यापनावर परिणाम होत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. एका बाजूला सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत. दुसऱ्या बाजूला शिक्षकांना मतदार यादी पुनरिक्षणाच्या कामावर पाठवले जात असल्याने ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची टीका होत आहे.
शिक्षक संघटनांच्या म्हणण्यानुसार, विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षण आणि विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेसाठी शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नियमित अध्यापनात व्यत्यय येत आहे. अनेक शाळांमध्ये वर्ग रिकामे राहत आहेत. शिक्षकांना दिवसभर निवडणूकविषयक कामात गुंतवले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा थेट परिणाम होत असल्याचा दावा संघटनांनी केला आहे.
यासंदर्भात शिक्षक-शिक्षकेतर संघटनांनी निवडणूक आयोगाकडे निवेदन देत शिक्षकांना नियमित शालेय वेळेत निवडणुकीची कामे देऊ नयेत, अशी मागणी केली आहे. शिक्षकांवर विविध अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा टाकल्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचेही संघटनांनी नमूद केले आहे. शिक्षक संघटनांचे राज्य सरचिटणीस शरद भांडारकर यांनी सांगितले की, शिक्षकांवर एसआयआरसह विविध प्रशासकीय कामांचा ताण वाढत आहे. जर निवडणुकीची कामे आवश्यक असतील, तर ती शाळेच्या वेळेनंतर किंवा सुट्टीच्या दिवशी देण्यात यावीत, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल.
शिक्षक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा हवाला देत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. शालेय वेळेत शिक्षकांना निवडणूक कामातून मुक्त करण्याचा निर्णय घेण्याची मागणी राज्य शासन आणि निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाचं विशेष मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम सुरु केला आहे. यात राज्यातील हजारो शिक्षक सध्या बीएलओ म्हणून घराघरात जाऊन मतदार पडताळणीचं काम करत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वर्गात विद्यार्थी आहेत. पण शिक्षक मात्र गावात मतदारांची माहिती गोळा करत असतात. याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसत आहे.
आता या कामात आणखी भर पडली आहे. शिक्षण विभागाने शिक्षकांना शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्याची मोहीम देखील सोपवली आहे. मुख्य निवडणूक आयोगाने स्पष्ट आदेश दिले जात आहे. शिक्षकांना इतर अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवू नये. असे असतानाही शिक्षण विभागाने शिक्षकांवर आणखी एक मोहीम सोपवल्यामुळे शिक्षकांमध्ये संताप वाढला आहे. .
शाळा, त्यानंतर मतदार यादीचं काम आणि त्याचबरोबर शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध..अशा तिहेरी जबाबदाऱ्या शिक्षकांवर टाकण्यात आल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.
"आम्ही शिकवायचं कधी?"असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. मुलांच्या अभ्यासाला प्राधान्य द्यायचं की रोज नवीन शासकीय मोहिमा राबवायच्या? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. शिक्षकांचं मूळ आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवणं हे आहे." कारण शिक्षक वर्गात असतील, तरच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबेल आणि शिक्षणाची गुणवत्ता टिकून राहील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.