MSRTC Bus & CM Eknath Shinde  Sarkarnama
महाराष्ट्र

ST Strike Back : मोठी बातमी! महायुती सरकारचं मोठं यश; एसटी संप अखेर मागे

Mayur Ratnaparkhe

ST employee and CM Shinde Meeting : एस.टी. कर्मचाऱ्यांनी संप अखेर मागे घेतला आहे. मूळ पगारात एकूण साडेसहा हजार रुपयांची वाढ झालेली आहे. एस.टी.कर्मचाऱ्यांची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. यामुळे आता एस.टी. कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गणेशोत्सवाच्या धामधुमीत एस.टी.कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने सर्वसामान्यांची मोठी अडचण झाली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर यशस्वीपणे तोडगा काढला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा पगार मिळावा. यासह अन्य प्रलंबित मागण्यासाठी दोन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक संघटनांनी संप पुकारला होता.

या संपावरच तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांनी सह्याद्री गेस्ट हाउसवर एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. अखेर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, परिणामी संप मागे घेण्यात आला.

विशेष म्हणजे या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात साडेसहा हजार रुपयांची वाढ जाहीर केली आहे. याशिवाय इतर मागण्याबाबत शासन सरकारात्मक आहे आणि त्यावर देखील लवकरात लवकर तोडगा आपण काढू असं आश्वासन सरकारकडून कर्मचारी संघटनांना मिळालं आहे.

गोपीचंद पडळकरांनी सांगितली सविस्तर माहिती -

बैठकीत झालेल्या निर्णयांबाबत आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, 'राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्याचं आजच्या बैठकीकडे लक्ष होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचं महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने मी मनापासून आभार व्यक्त करतो.'

तसेच 'आमची मागणी होती, की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहीजे. किमान त्यांच्याबरोबरीने घेवून गेलं पाहीजे. सरकारने जी अधिकाऱ्यांची समिती गठीत केली होती. त्यांनी २०२०पासून साडेपाच हजार रुपयांची वाढ सरसकट करावी, अशी विनंती केली होती. सरकारने आमची विनंती मान्य केलेली आहे.' असंही पडळकर यांनी सांगितलं.

याचबरोबर 'ज्या कर्मचाऱ्यांसाठी नोव्हेंबर २०२१मध्ये अडीच हजार रुपये, चार हजार आणि पाच हजार अशी वाढ केली होती. त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सरसकट साडेसहा हजार रुपयांची वाढ केलेली आहे. म्हणजेच ज्यांना पाच हजारांची वाढ २०२१ला झाली होती, त्यांच्या मूळ पगारात दीड हजार रुपयांची वाढ झाली. ज्यांना चार हजार रुपयांची वाढ दिली गेली होती, त्यांच्या मूळ पगारात अडीच हजार रुपयांची वाढ झाली आणि अडीच हजारांची वाढ दिली होती, त्यांच्या मूळ पगारात चार हजार रुपयांची भरघोस वाढ राज्य सरकारने केलेली आहे.' अशी माहिती पडळकरांनी दिली.

'मी महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्यावतीने आभार व्यक्त करतो. सर्व संघटनांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं, अभिनंदन केलं. त्यामुळे महाराष्ट्रीतील सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, तुम्ही जो संप पुकारला होता, तो यशस्वी झाला आहे. उद्यापासून सर्वांना आपल्या कामावर हजर व्हावे, अशी विनंती.' असं आवाहन पडळकरांनी यावेळी केलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT