Bhagat Singh Koshyari, Nitin Gadkari, Sundhashu Trivedi Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महाराष्ट्र स्तब्ध झाला होता, संयमही वाखाणण्याजोगा होता...

अय्यूब कादरी

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गेल्या वर्षी सातत्याने वादग्रस्त विधाने करण्यात आली. अशी विधाने करणाऱ्यांमध्ये घटनात्मक पदावरील व्यक्ती आणि राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवक्त्याचा समावेश होता. त्यामुळे महाराष्ट्र स्तब्ध झाला होता.

घटनात्मक पदावरील व्यक्ती म्हणजे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि प्रवक्ते होते सुंधाशू त्रिवेदी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते. स्वतःला शिवरायांचे मावळे म्हणवून घेणारे सत्ताधारी पक्षांतील आमदार याबाबत मूग गिळून गप्प होते. अखेर केंद्रीय मत्री नितीन गडकरी यांनी समोर येऊन वादग्रस्त विधाने करणाऱ्यांना समज दिली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, आई-वडिलांपेक्षा आमची त्यांच्यावर जास्त निष्ठा आहे, असे गडकरी म्हणाले होते.

कोश्यारी यांना महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. विसरणार नाही म्हणजे वाईट अर्थाने. त्यांची कारकीर्द सतत वादग्रस्त ठरत गेली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. अशी विधाने करू नयेत, इतकी समज कोश्यारी यांना नसेल, असे कसे म्हणता येईल? त्यांना ती समज नक्कीच असणार. महाराष्ट्रातील महामानवांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करणे, तशी वक्तव्ये सातत्याने करत राहणे, हे ठरवून केले गेलेले कारस्थान होते, अशी शंका येते.

एखादी गोष्ट वारंवार सांगितल्यास काही लोकांना ती खरी वाटू लागते. छत्रपती शिवराय हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक मानले जातात. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. त्यांच्यामुळे महिला शिकू लागल्या. सनातनी व्यवस्थेला या दोन्ही बाबी परवडणाऱ्या नाहीत. एका विशिष्ट समाजाच्या विरोधात शिवरायांच्या सातत्याने वापर करण्यात आला. मात्र, लोक लिहिते-वाचते झाले. त्यामुळे खरे शिवराय लोकांना कळू लागले. पर्यायाने मग त्यांचा एका विशिष्ट समाजाच्या विरोधात वापर करणे अवघड होऊ लागले, मग करायचे काय? समाज ज्यांना आदर्श मानतो, ज्यांच्या विचारांचे अनुकरण करतो, त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवायचे किंवा त्यांना कमी लेखायचे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोश्यारी कमी की काय म्हणून सुधांशू त्रिवेदीही समोर आले. शिवरायांनी औरंगजेबाची माफी मागितली होती, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत, असे कोश्यारी म्हणाले होते. यासोबतच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून नितीन गडकरी यांच्यापर्यंत तुम्हाला नव्या युगाचे आदर्श येथे भेटतील, असेही ते म्हणाले होते. त्या कार्यक्रमाला गडकरीही उपस्थित होते. कोश्यारी यांच्या या विधानाने त्यांची मोठीच गोची झाली होती. उपस्थित श्रोत्यांमधूनही कुणी आक्षेप घेतला नाही.

गडकरींनी कोंडी फोडली...

शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून डी.लिट. प्रदान करण्यात आली. त्या कार्यक्रमात कोश्यारी बोलत होते. शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने कोश्यारी, त्रिवेदी यांच्यावर कठोर टीका करत भाजपला घेरले होते. त्यामुळे भाजपची कोंडी झाली होती. नितीन गडकरी यांनी समोर येऊन ही कोंडी फोडली होती.

कायदाही त्याची म्हणावी तशी दखल घेत नाही...

ही एक प्रकारची नियोजित पद्धत असते. सातत्याने महामानवांविरुद्ध बोलायचे. लोकांची प्रतिक्रिया कशी येते पाहायचे. प्रतिक्रिया सौम्य असेल तर नियोजित पद्धतीने आपली मोहीम सुरू ठेवायची. प्रखर विरोध व्हायला लागली की, मग माफी मागून मोकळे व्हायचे. त्या काळात महाराष्ट्राने दाखवलेला संयम वाखाणण्याजोगा होता.

आपल्या आदर्शांबाबत, अस्मितांबाबत वादग्रस्त विधाने करणारी व्यक्ती कोण आहे, त्यानुसार कोणत्या स्वरूपाची प्रतिक्रिया द्यायची, असे समाजाने ठरवले आहे काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. कारण महात्मा फुले यांच्याबद्दल सातत्याने कुणी ना कुणी वादग्र्स्त विधाने करत राहतो, मग राज्यात सरकार कोणत्याही पक्षाचे असो, कायदाही त्याची म्हणावी तशी दखल घेत नाही, त्यामुळे असे प्रकार सुरूच राहतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT