Mumbai News: महायुतीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच भाजपबाबत नाराजी व्यक्त केल्याचं समोर येत आहे. त्यांनी अधिवेशनानंतर सात दिवसांतच अर्थखातं राष्ट्रवादीकडे देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, भाजपकडे वारंवार मागणी करुन आणि दोन महिन्यांनंतरही अर्थखातं राष्ट्रवादीला देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणताही निर्णय घेतला नसल्याचं सांगत पवारांनी देवगिरीवर पक्षाच्या नेत्यांसमोर खंत व्यक्त केली होती.आता यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
दिल्लीत मंगळवारी (ता.27 मे) कांदा आणि साखर प्रश्नांबाबत केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. या बैठकीनंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सुनेत्रा पवारांनी अधिवेशनानंतर अद्यापही अर्थखातं न दिले गेल्याविषयी पक्षीय नेत्यांसमोर व्यक्त केलेल्या नाराजीवर भाष्य केलं. ते म्हणाले,माझ्याकडे कोणीही अर्थखातं मागितलेलं नाही, मागितल्यावर बघू असं स्पष्ट करत विषय संपवला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या जागावाटपाबाबत महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, मी काल सांगितलं,पुन्हा सांगतो,उद्या पुन्हा विचारू नका. जागावाटपावर आमचं जवळपास एकमत झालेलं आहे.फक्त शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरपैकी एक जागा आम्हाला मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
याचवेळी त्यांनी राष्ट्रवादीने पुण्याची जागा मागितली आहे. त्यामुळे या दोनच गोष्टींवर आमचं अडलं आहे, यावर आम्ही एकत्र बसून तोडगा काढू. आता कठीण पेपर संपलेला आहे, सोपा पेपर बाकी आहे. टिकमार्क करायचं आहे फक्त, त्यानंतर विषय संपतील, असा दावाही मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी केला.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थखातं त्यांच्याकडे घेतलं होतं. तसेच त्यांनी अधिवेशनात अर्थसंकल्पही सादर केला होता. त्यावेळी भाजपकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर सात दिवसांत अर्थखातं देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, वारंवार याबाबत मागणी करुन आणि दोन महिने उलटूनही राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखातं मिळालेलं नाही. यावरुनच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उघडउघड नाराजी बोलून दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत मुंबईतील देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली होती. याच बैठकीत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांनी अर्थखात्यावरून सरकार तसेच भाजपबाबत खंत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती.
सुनेत्रा पवार यांनी भाजपकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर सात दिवसांत अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीला देण्याबाबत शब्द देण्यात आला होता. पण वारंवार विषय काढूनही मुख्यमंत्र्यांनी अद्यापही अर्थखात्याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याची खंत पवार यांनी व्यक्त केल्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. या त्यांच्या नाराजीमुळे महायुतीत नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.