Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानपरिषद व राज्य सभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व मंत्रीमंडळातील मंत्री उपस्थित होते. यावेळी विविध महत्वपूर्ण विषयावर चर्चा पार पडली. विशेषतः या बैठकीत विधानपरिषद व राज्य सभेच्या उमेदवारांच्या नावावर चर्चा पार पडली. या बैठकीनंतर प्रसार माध्यमाशी बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महायुतीच्या जागावाटप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवांरांच्या नावाच्या घोषणेबाबत मोठे विधान केले.
विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमधील तीन घटक पक्षाची जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. या चर्चेनंतर शनिवारी दुपारपर्यंत महायुतीच्या जागावाटपाची घोषणा अधिकृतरित्या केली जाणार आहे. त्यानंतर काहीवेळातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विधान परिषद व राज्य सभेच्या उमेदवांरांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सुनील तटकरे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना दिली.
त्यासोबतच यावेळी पत्रकारांनी गेल्या बैठकीत झालेल्या वादाबद्दल विचारणा केली असता याबाबत आमच्यात कोणातच वाद झाला नसल्याचे स्पष्ट करीत वादाच्या प्रश्नावर पडदा टाकला. यावेळी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), सुनील तटकरे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विवश प्रश्नांना उत्तरे दिली.
राज्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या १७ जागाबाबत महायुतीमधील तीन पक्षात बोलणी सुरु आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. महायुतीची जागावाटपाबाबत बोलणी अद्याप सुरु असून उद्या घोषणा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करीत असताना आम्ही तीन जागांची मागणी केली असल्याचे यावेळी सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या आमदारांच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. महाविकास आघाडीनं 17 जागांसाठीचं जागा वाटप निश्चित केलं आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे. त्यामुळे सर्वांचे घोषणेकडे लक्ष लागले आहे.