Abdul Sattar- Raosaheb Danve  Sarkarnama
महाराष्ट्र

Abdul Sattar News : महायुतीचे बारा वाजले, सत्तारांच्या मतदारसंघातच रावसाहेब दानवेंच्या विरोधात मोर्चा

Jagdish Pansare

Shivsena-BJP Political News : लोकसभा निवडणुकीत महायुती असून महायुतीचे अधिकृत उमेदवार रावसाहेब दानवे यांच्याविरोधात काम करणे राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलेच महागात पडणार असे दिसते. गणेशोत्सवाच्या काळात भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर रावसाहेब दानवे भडकले होते. रस्त्यावर उतरत त्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आक्रमक पावित्रा घेतला.

सत्तार यांच्यामुळे सिल्लोडचे पाकिस्तान होत आहे, याचा पुनरुच्चार दानवे यांनी केला होता. त्यानंतर आता अब्दुल सत्तार समर्थकांनी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी सिल्लोडचा उल्लेख वारंवार पाकिस्तान असा केल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी केली आहे. यासाठी उद्या (ता.18) गुरुवारी सिल्लोडमध्ये मोर्चा काढून बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

महायुतीच्या दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सिल्लोडमध्ये काय घडणार? याकडे सगळ्या राज्याचे लक्ष असणार आहे. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभा निवडणुक एकत्रच लढणार, असे महायुतीच्या राज्यातील नेत्यांनी स्पष्ट केले होते. परंतु लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म घटक पक्षाच्या नेत्यांनी पाळला नाही, असा आरोप तीनही पक्षांकडून केला गेला.

राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी आपण महायुतीच्या उमेदवारासाठी तुमच्याकडे मतं मागायला आलो नव्हते, असे जाहीर सांगितले. या विधानाचा व्हिडिओ समाज माध्यमांध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. (Abdul Sattar) शिवसेनेचेच दुसरे मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी लोकसभेच्या जालना मतदारसंघात आपण काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांचे काम केल्याची जाहीर कबुली दिली होती. महायुतीचा धर्म न पाळल्याचे साईड इफेक्ट आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिसू लागले आहेत.

जालना लोकसभा निवडणुकीत माझा पराभव कोणत्या मंत्री किंवा नेत्यामुळे झाला नाही, तर तो जनतेने केला, असे दानवे सांगत असले तरी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सिल्लोडमध्ये त्यांनी रान पेटवायला सुरवात केली हे निश्चित. गेल्या 30-35 वर्षापासून पडद्यामागची मैत्री लोकसभेतील पराभवाने तुटली असे चित्र सध्या तरी सत्तार-दानवे यांच्याकडून निर्माण केले जात आहे. दोन महिन्यात या चित्रामध्ये अजून काय बदल घडतील? हे आज सांगणे अवघड आहे.

अब्दुल सत्तार-रावासाहेब दानवे हे धुर्त राजकारणी म्हणून ओळखले जातात. लोकसभेतील पराभवामुळे दानवे अडचणीत आहेत, तर विधानसभेला मुलाला दगाफटका होऊ नये, याची चिंता त्यांना सतावते आहे. दुसरीकडे अब्दुल सत्तार मतदारसंघातील विजयाचे गणित बिघडायला लागले, तर शेवटच्या क्षणी दानवेंशी हातमिळवणी करू शकतात, असे भाजपमधीलच काही पदाधिकारी, कार्यकर्ते खासगीत चर्चा करताना दिसतात.

पण आमच्यात आता मैत्री राहिलेली नाही, आम्ही ऐकमेकांचे कट्टर शत्रू बनलो आहोत, हे दाखवण्यासाठी दोन्ही बाजूने हा खटाटोप सुरू असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. येणाऱ्या काळात सत्तार-दानवे यांची कुस्ती लुटूपुटूची आहे, की खरीखुरी? हे स्पष्ट होईल. तुर्तास सिल्लोडमध्ये शिवसेना-भाजपमध्ये तानातानी सुरू झाली आहे.

सिल्लोडचे पाकिस्तान झाले या दानवे यांच्या टीकेनंतर सत्तार समर्थक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. दानवेंनी केलेल्या विधानावर तीव्र आक्षेप नोंदवत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा, या मागणीसाठी उद्या सकाळी 11 वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पासून मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर उपजिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT