Rahuri Crime Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Crime News : नगर जिल्हा हादरला; वकील दाम्पत्याची अपहरण करून हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Pradeep Pendhare

Ahmednagar Crime News : राहुरी येथील न्यायालयात प्रॅक्टीस करणारे वकील दाम्पत्याचे अपहरण करून हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. वकील राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव (दोघे रा. मानोरी, ता. राहुरी), असे हत्या झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. आढाव दम्पत्याच्या हत्येच्या संशयावरून राहुरी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. तर आणखी दोन संशयित पसार आहेत. आढाव यांच्या एका पक्षकारानं ही हत्या केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

राहुरी न्यायालयातील वकील राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी वकील मनीषा हे गुरूवारी दुपारपासून न्यायालय परिसरातून अचानक बेपत्ता झाले. यामुळे वकील संघटना आणि तालुक्यात खळबळ उडाली. वकील आढाव दाम्पत्य बेपत्ता झाल्याची तक्रार राहुरी पोलिसांकडे दाखल होताच, त्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली. तसेच राहुरी वकील संघटनेचे अध्यक्ष ऋषीकेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची भेट घेत तपास करण्याची मागणी केली.

आढाव वकील दाम्पत्य हे राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढाव वस्ती येथे राहते. दोघेही राहुरी येथील न्यायालयात (Court) वकिली व्यवसाय करायचे. राजाराम आढाव हे गुरूवारी दुपारपर्यंत राहुरी येथील न्यायालयात कामकाज करत होते. त्यानंतर दुपारी दोन वाजेदरम्यान ते नगर येथे गेले. एका पक्षकाराला पाठवून त्यांनी त्यांच्या पत्नी मनीषा यांना बोलावून घेतले, अशी माहिती सांगितली जात होती. तेव्हापासून आढाव दाम्पत्य बेपत्ता झाल्याची चर्चा होती.

दरम्यान, आढाव यांची मोटारगाडी राहुरी शहरातील न्यायालय परिसरात बेवारस स्थितीत उभी होती. राहुरी पोलीस मध्यरात्री गस्त घालताना आढाव यांची कार न्यायालयाच्या आवारात उभी आढळली. राहुरी पोलिस तिची तपासणी करत असताना, तिथे न्यायालयाच्या आवारात आणखी एक कार आली. पोलिसांना पाहाताच ती कार तेथून सुसाट निघून गेली.

पोलिस निरीक्षक ठेंगेंनी आढावांच्या कारची तपासणी केल्यावर त्यात एक हातमोजा, दोर, मोबाईलचे कव्हर आणि एक बूट आढळला. पोलिसांनी न्यायालयाचा परिसर पुन्हा पिंजून काढला. त्यावेळी त्यांना आढावांची दुचाकी न्यायालयाच्या मागील बाजूला बेवारस स्थितीत आढळली. आढाव यांचे एटीएम कार्ड राहुरी येथील आयसीआयसीआय बँकेसमोर सापडले. आढावा दाम्पत्याचे अपहरण झाल्याचा संशय बळावला. तसे तपासात देखील उघडकीस आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांना पाहून सुसाट निघून गेलेल्या कारचा शोध घेण्याच्या सूचना ठेंगेंनी गुन्हे शोध पथकाला केल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाना कारचा शोध घेत तिघा संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीसमोर तिघांनी दम तोडला आणि आढावा दाम्पत्याबरोबर केलेल्या घटनेची माहिती दिली. आढावा दाम्पत्याची हत्या करून त्यांना (Rahuri) राहुरीतील उंबरे गावातील स्मशानभूमी लगत असलेल्या बारवमध्ये मोठ्या दगडांना बांधून टाकल्याचे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तिथे धाव घेत बारवमधील पाणी चार ते पाच विद्युतपंपाने उपसून आढाव दाम्पत्यांचे मृतदेह बाहेर काढले. या हत्येत आणखी दोन जण संशयितांची नावे ताब्यात घेतलेल्यांनी सांगितली आहेत. ते पसार असून, गुन्हे शोध पथक त्यांचा शोध घेत आहे. आढाव यांच्या एका पक्षकारानं ही हत्या केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT