Ahmednagar Politics
Ahmednagar Politics Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics : ''...तर आनंद द्विगुणित झाला असता!''; नगरच्या नामांतरानंतर आमदार जगतापांनी छेडला विभाजनाचा मुद्दा

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar : चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ जयंती सोहळा कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचं नाव लवकरच अहिल्यानगर करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यावर अहमदनगरचे स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी देखील आपली प्रतिकिया दिली आहे. त्यांनी नामांतरासोबत जिल्ह्याचं विभाजन देखील झालं असतं तर जास्त आनंद झाला असता असं विधान करत नवीन मुद्दा छेडला आहे.

नगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरच्या नामांतराबाबतच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. जगताप म्हणाले, नामांतराच्या निर्णयाचं स्वागतच असे तसेच याबद्दल आनंदही झाला. मात्र, या नामांतराबरोबरच जिल्ह्याच्या विभाजनाचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी घोषित केला असता तर हाच आनंद अजून द्विगुणीत झाला असता असं विधान केलं आहे.

याबाबत जगताप म्हणाले, गेल्या आठ-दहा वर्षांपासून जिल्ह्याचं विभाजन होणार अशा चर्चा होतात. तशी मागणीही केली जाते. मात्र, प्रत्यक्षात अजून निर्णय घेण्यात आलेला नाही. जिल्ह्याचा दक्षिण आणि उत्तर असा मोठा भाग मिळून अहमदनगर जिल्हा आहे. त्यामुळे राज्यात सर्वात मोठ्या भौगोलिक क्षेत्र असलेल्या या जिल्ह्यातील प्रशासनास काम करण्यास अनेकदा ताण येताना दिसतो. त्याचबरोबर विकासात्मक कामे प्रशासन चालवणे आदी गोष्टींचा विचार याबाबत होणे गरजेचे आहे. प्रशासन प्रमुखांनाही याबाबत मोठं काम करावं लागतं असंही जगताप म्हणाले.

भविष्यात 'हा' प्रश्न निर्माण होऊ शकतो!

नामांतराचा हा विषय महत्त्वाचा आहे हे नक्कीच आनंदाची गोष्ट झालेली आहे. मात्र, भविष्यात कधीतरी जिल्हा विभाजन ज्यावेळी होईल. त्यावेळी या जिल्ह्याचे नाव काय किंवा त्या जिल्ह्याचे नाव काय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नामांतर घोषित करतानाच जिल्हा विभाजनही घोषित केले असते तर अजून आनंद झाला असता असं आमदार संग्राम जगताप(Sangram Jagtap) यांनी म्हटलं आहे.

पडळकरांची मागणी....

राम शिंदे आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी यासाठी यापूर्वीच जिल्हा नामांतराची मागणी करत जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावं यासाठी पुढाकार घेतला होता. आमदार पडळकर यांनी अधिवेशनात देखील अहमदनगरच्या नामांतरावरुन आवाज उठवत यासाठी जोरदार मागणी सरकारकडे केली होती. त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर यांनी यासाठी नामांतर यात्रा ही नुकतीच काढली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT