Jaljeevan Yojana corruption : जलजीवन मिशन योजनेतील अनियमिततेवरून भाजप मंत्री राधाकृष्ण विखे चांगलेच आक्रमक झाले आहेत. या योजनेतील अनियमितता म्हणजे, सहनशक्ती पलिकडे गेलेला विषय आहे. योजना ठेकेदारांसाठी आहे की, नागरिकांसाठी हेच कळायला मार्ग नाही. पैशांचा अपहार झाल्याचे दिसते.
अहिल्यानगर जिल्ह्यातील एकही तालुका अपवाद नाही, जिथे तक्रार नाही. आता जलजीवनच्या दोषी ठेकेदारांवर तत्काळ गुन्हे नोंदवा, असा आदेश मंत्री विखे यांनी दिला आहे. तत्पूर्वी गेल्या आठवड्यात मंत्री विखे पुत्र माजी खासदार सुजय विखे यांनी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांचे जलजीवनमधील ठेकेदारांशील लागेबांधे असल्याचा आरोप केला होता.
अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा, जलजीवन मिशन व महावितरण विभागांच्या कामकाजाचा मंत्री विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा नरवाडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, तहसीलदार मिलिंद वाघ उपस्थित होते.
या आढावा बैठकीत गावोगावचे ग्रामस्थं, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून पाणीपुरवठा योजनेचे वाभाडे काढण्यात आले. याची दखल घेत मंत्री विखे यांनी जलजीवनचा खरपूस समाचार घेताना कारवाईच्या सूचना केल्या. पाणीपुरवठा (Water) योजनांच्या कामात मोठा गोंधळ असून ठेकेदार चुकीच्या आणि मनामनी पद्धतीने अंमलबजावणी करीत आहेत. त्यांना अधिकारी पाठीशी घालत आहे. निपाणीवडगाव-खोकरची योजनेवर तर इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना पीएचडी करता येईल, असा उपरोधिक टोला देखील मंत्री विखे यांनी लगावला.
मंत्री विखे यांनी जलजीवनच्या अनियमिततेवर नाराजी व्यक्त करताना ठेकेदारावर तत्काळ गुन्हे नोंदवा, असे आदेश दिले आहेत. दरम्यान, मंत्री विखे यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे यांनी काही दिवसांपूर्वी जलजीवन योजनांची कामे, सर्वेक्षण ते ठेकेदार नियुक्तीपर्यंतची कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेली आहेत. त्यांनी बसवलेल्या लोकांकडून कामे करून घेण्याची नामुष्की आमच्यावर आली आहे. कर्जत-जामखेडमधील ठेकेदार आमदार रोहित पवार व पारनेरमधील ठेकेदार खासदार नीलेश लंके यांच्याशी लागेबांधे असलेले आहेत, असा थेट आरोप केला होता.
दरम्यान, खासदार नीलेश लंके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जलजीवनची कामातील अनियमिततेची तक्रार केंद्र सरकारकडे केली होती. यानुसार केंद्र सरकारच्या पथकाने पाथर्डीत तपासणी केली. यात 137 गावांत या योजनेची कामं पूर्ण झाली असून, चार गावांत ही योजना फक्त कागदावर असल्याचं समोर आलं. पण योजनेचा एकाही गावाला फायदा मिळालेला नाही. या योजनांपैकी 32 योजना जिल्हा परिषद संचालित असल्याचे समोर आलं. विखे पिता-पुत्र आणि खासदार लंके, आमदार पवार यांच्यात जलजीवन मिशनवरून जोरदार राजकारण रंगणार, असे दिसते आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.