Ahilyanagar heritage gate removal : अहिल्यानगरमधील ऐतिहासिक माळीवाडा वेस पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने हरकती मागवल्या आहेत. ऐतिहासिक माळीवाडा वेस पाडण्याच्या प्रशासनाने नुसत्या हरकतींवर नगरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महापालिका असा निर्णय कसं घेऊ शकतं, यावरून नगरमधील इतिहासप्रेमींमध्ये संताप असून, हरकतींद्वारे आपल्यातील संतापाला मोकळी वाट करून देत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी ऐतिहासिक माळीवाडा वेस नाव पुसण्यासाठी काही समाजकंटक राजकारणी आयुक्तांच्या मदतीने हा वेस पडण्याच्या डाव आखत आहेत, असा गंभीर आरोप केला आहे. तर आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ही वेस अडथळा ठरत असून, ती हटवावी, अशा मागणीचे चार मंडळांची निवेदनं आहेत. ही वेस हटवल्यानंतर तिथं क्रांतीसूर्य महात्मा फुले दाम्पत्यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा होईल, असे 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.
अहिल्यानगर शहरातील माळीवाडा वेस ही ऐतिहासिक, अशी ओळख आहे. इतिहासामध्ये देखील तिचे दाखले मिळतात. ही वेस अडथळा ठरत असून, ती हटवण्यात यावी, अशी स्थानिक चार मंडळांनी मागणी केली आहे. त्यामुळे ही काढावी का? यावर महापालिका (AMC) प्रशासनाने हरकती मागवल्या आहेत. महापालिकेच्या मागवलेल्या हरकतीतून इतिहासप्रेमी नगरकर आपल्या संतापाला वाट मोकळी करून देत आहेत.
ऐतिहासिक माळीवाडा वेस हटवण्याच्या नुसत्या हरकतींवरून शहरात खळबळ उडाली आहे. महापालिका प्रशासनाचा हा निर्णय चुकीचा ठरले. वेस पडली, तर येणाऱ्या काळात माळीवाडा या नावाची चर्चा देखील शहरात होणार नाही. माळीवाडा नाव पुसण्यासाठीच काही समाजकंटक राजकारणी आयुक्तांच्या (Commissioner) मदतीने ही ऐतिहासिक वेस पडण्याच्या डाव आखत आहे, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी केला. “जर आयुक्तांमध्ये खरोखर हिंमत असेल, तर शहरातील इतर विकास अडवणाऱ्या, जीर्ण, पुरातन इमारती आधी पाडून दाखवा. मगच वेशीचा विषय काढा!” असे आव्हान भुतारे यांनी दिले आहे.
महापालिकेने शहर गावठाणाच्या दक्षिण बाजूस असलेल्या माळीवाडा वेश हटविण्याबाबत मिळालेल्या अर्जांच्या संदर्भात 11 ते 17 डिसेंबर या कालावधीत हरकती व सूचना मागवल्या आहेत. माळीवाडा वेश परिसरात पाच रस्ते एकत्र येतात, धार्मिक स्थळे, मंदिरे, शाळा, दवाखाने, व्यावसायिक आस्थापना व मिरवणूक मार्ग असल्याने सतत कोंडी निर्माण होते, विद्यार्थ्यांना व रुग्णांना अडचणी निर्माण होतात, या कारणास्तव वेश स्थलांतरित किंवा हटविण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे महापालिकेने प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे.
महापालिका प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतले जात आहेत. शहरातील इतर वारसास्थळांकडे लक्ष वेधले आहे. अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) शहराची स्थापना झाल्यापासून अस्तित्वात असलेल्या बारा वेशांपैकी आज फक्त दोनच वेस शिल्लक आहेत. दिल्ली दरवाजा आणि माळीवाडा वेस! या दोनच उरलेल्या वारशांपैकी एकावर हात घालण्याची घाई का? असा सवाल नितीन भुतारे यांनी उपस्थित केला आहे.
अहिल्यानगर शहरात अनेक ठिकाणी जुन्या, कोसळण्याच्या अवस्थेतील इमारती व पुरातन वास्तू उभ्या असून त्या विकासाला मोठा अडथळा ठरल्या आहेत. अशा वास्तूंमुळे नवीन प्रकल्प, रस्ते, आणि अगदी महापालिकेच्या स्वतःच्या इमारतीचे कामसुद्धा अडकले आहे. मुंबई, पुणे तसेच अनेक भारतातील शहरात सुध्दा ऐतिहासिक वस्तू जतन केल्या जात आहेत. ही माळीवाडा वेस देखील जतन व्हावी. तिचे सुशोभिकरण व्हावे. अहिल्यानगर शहरातील खरोखर डोकेदुखी ठरलेल्या पुरातन वास्तू आधी हटवा किंवा स्थलांतरित करा. त्या समस्यांना हात न लावता, अचानक ऐतिहासिक वेशीला लक्ष्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा घाट आयुक्तांनी घालत आहेत का? असा सवाल नितीन भुतारे यांनी उपस्थित केला.
महापालिका प्रशासनाने ऐतिहासिक वेशीला हात लावल्यास इतिहासप्रेमी, पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन रस्त्यावर उतरूच, वेळप्रसंगी न्यायालयात देखील ही लढाई उभी करू, असा इशारा नितीन भुतारे यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.