Flood affected farmers Maharashtra : भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची संकटमोचक म्हणून ओळख आहे. परंतु हेच संकटमोचक अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा पाहणी दौरा, रस्ता खचल्याने मागे फिरल्याचं समोर आलं आहे.
समाज माध्यमांवर तसा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तसंच अहिल्यानगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील त्यांच्या ट्विटरवर मंत्री महाजन यांच्या पाहणी दौऱ्याला सुनावलं आहे.
रोहित पवार यांनी, मदत करता येत नसेल तर, किमान शेतकऱ्यांची (Farmer) थट्टा तरी करू नका. इतकंच या सरकारला आणि बिनकामी मंत्र्यांना सांगणं आहे. उगाच पर्यटन करायला आल्यासारखं यायचं आणि आपल्या आलिशान गाड्या बांधावर जात नाहीत म्हणून माघारी फिरायचं हे धंदे मंत्र्यांनी करू नयेत, असं सुनावलं आहे.
मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची भाजपमध्ये संकटमोचक म्हणून ओळख आहे. त्यावर उपमेवर मार्मिक हल्ला चढवताना, आमदार रोहित पवार यांनी, स्वत:ला मोठे संकटमोचक म्हणवणारे महाजनसाहेब बेलगाव पिंपळगाव (जि. धाराशिव) इथं फक्त रस्ता खचला म्हणून पाहणी न करताच परतले, याहून मोठं दुर्देव ते काय? असा घणाघात केला आहे.
'जिथून महाजन साहेब माघारी फिरले, तिथेच हाकेच्या अंतरावर विश्वनाथ दातखिळे यांच्या गोठ्यातील 35-40 जनावरं दगावून संपूर्ण गोठा उद्ध्वस्त झाला. दातखिळे कुटुंबावरील संकटाचं भान तरी मंत्री महाजन साहेब यांनी ठेवायला हवं होतं,' असं आमदार पवार यांनी मंत्री महाजनांना सुनावलं.
'सरकारने केवळ दिखाव्यासाठी मंत्र्यांचे दौरे काढून खर्च वाढवण्यापेक्षा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी 50 हजारांची मदत करावी आणि कर्जमाफीचाही निर्णय घेऊन संकटातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,' अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.
काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी देखील मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. संकटमोचक म्हणून राज्यात स्वतःला मिरवणारे, सत्तेसाठी विविध पक्षातील नेते पळवणारे गिरीश महाजन अतिवृष्टीने बळीराजा संकटात असताना पळ काढत आहेत, असा टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या दीड तासाच्या पाहणी दौऱ्यावर देखील रोहित पवार यांनी निशाणा साधला. मंत्री देसाई यांचा दीड तासांचा पाहणी दौरा. या पार्श्वभूमीवर मंत्री देसाईसाहेब कामात काम आणि हरिनामाचाही योग साधण्याची संधी आहे. त्यासाठी सिद्धटेकचा श्री सिद्धीविनायक, राशीनची श्री जगदंबा माता आणि कर्जतमध्ये असलेल्या सद्गुरु संतश्री गोदड महाराज यांच्या समाधीच्या ठिकाणी अवश्य भेट देऊन दर्शनाचा लाभ घ्या. खर्ड्यामध्ये सिद्धसंत श्री सीतारामबाबा आणि सद्गुरु संतश्री गीतेबाबा यांच्या समाधीलाही भेट द्यायला विसरू नका, असे रोहित पवार यांनी म्हटले.
अतिवृष्टीमुळं जामखेड इथल्या नागेश्वर मंदिरासह मतदारसंघात असलेल्या महादेवाच्या इतरही अनेक मंदिरांचं नुकसान झालं आहे. खर्डा भागातही अशीच परिस्थिती आहे. या सर्वच अध्यात्मिक स्थळांच्या दुरुस्तीसाठी ‘प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्या’अंतर्गत भरीव निधी द्यावा, अशी मागणी करताना मतदारसंघात आलाच आहात तर, राशीनच्या प्रसिद्ध शिपी आमटीचाही आस्वाद घेऊन जा! असा टोला मंत्री देसाईंना आमदार पवार यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.