Vasant Lodha Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar BJP: भाजपचे शहराध्यक्ष पक्षातील नगरसेवकांवरच नाराज; नेमकं कारण काय ?

Pradeep Pendhare

Ahmednagar News: 'राज्यात आणि देशात भाजप सुस्थितीत आहे. अनुकूल वातावरण आहे. असे असताना येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत नगर शहरात भाजपचाच आमदार करायचा. पक्षात अतिक्रमण करू पाहणाऱ्या डोमकावळ्यांना संधी न देता भाजपचाच निष्ठावान कार्यकर्ता आमदार झाला पाहिजे. राज्यात कितीही राजकीय उलथापालथ झाली, तरी थांबू नका. नगरचा पुढील आमदार भाजपचाच व्हावा, यासाठी नवीन कार्यकारिणीने जबाबदारीने काम करावे', असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत लोढा यांनी केली.

भाजपची नगर शहर कार्यकारिणी नुकतीच झाली. या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा पंडित दीनदयाळ परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी वसंत लोढा यांनी आक्रमक भाषण केले. भाषणातील 'डोमकावळा' हा शब्द बरंच काही सांगून जातोय, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. वसंत लोढा यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अभय आगरकर यांच्या पराभवासाठी नात्यागोत्यातील तालुक्याच्या नेत्याने दुहेरी निष्ठा ठेवत आपल्याला फार मोठा धोका दिला. त्यामुळे पराभवाला समोरे जावे लागले, असे म्हटले.

वसंत लोढा यांनी नगर शहरात एकाच घरात दोन आमदार, महापौर, नगरसेवक, त्यांचेच नातेवाईकही आमदार, असे असतानाही नगरची अवस्था आज किती बिकट झाल्याचे म्हटले. भाजपचा महापौर असताना व आताच्या शिवसेनेच्या महापौर असताना महापालिकेची सत्ता कोण चालवतंय हे सांगण्याची गरज नाही. याचा मोठा परिणाम शहराच्या विकासावर झाला आहे. आता हे चित्र बदलणे अत्यावश्यक असल्याचे ते म्हटले.

2024 ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी कोणतीही दुहेरी निष्ठा न ठेवता एकनिष्ठेने भाजपच्याच उमेदवाराचे काम करावे, जर पक्षाचा कोणी पदाधिकारी कार्यकर्ता अशी दुहेरी भूमिका घेत काम करत असेल तर त्याला बाजूला करा, असे आवाहनही त्यांनी केले. हा रोख कार्यकर्त्यांनी समजून घेतला. त्यांच्या या भाषणांचा रोख स्पष्ट होता. त्यामुळे त्यांच्या भाषणाची सध्या भाजपच्या नगर कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.

दीनदयाळ पतसंस्थेचे मानद सचिव विकास पाथरकर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक राजाभाऊ मुळे व अच्युत पिंगळे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, दीनदयाळ परिवाराचे अध्यक्ष धनंजय तागडे, सचिव बाळासाहेब भुजबळ, सदाशिव देवगावकर, संचालक नीलेश लोढा यांच्यासह कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.

शहराध्यक्षांनी नगरसेवकांविषयी व्यक्त केली नाराजी ?

"भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी वसंत लोढा यांची खदखद योग्यच आहे, असे म्हटले. नगर शहरात भाजपची ताकद पूर्वीपासूनच आहे. भाजपच्याच मोठ्या मदतीशिवाय तब्बल पाच वेळा शहरातून शिवसेनेचा आमदार होणे शक्यच नव्हते.

आता येणारा काळ जरी संघर्षाचा असला तरी अनुकूल आहे. आमदारकीचे स्वप्न साकार करायचे असेल, तर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे भूमिका मांडणे आवश्यक आहे. मात्र, महानगरपालिकेत पक्षाचा एकही नगरसेवक परखडपणे आपली भूमिका मांडत नाहीत, ही शोकांतिका आहे", असे म्हणत अभय आगरकर यांनी नाराजी व्यक्त केली.

Edited By - Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT