Ajit Pawar Plane Crash : बारामती विमानतळावर आज (दि. २८ जानेवारी २०२६) रोजी सकाळी घडलेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीला निघाले होते. त्यांच्या चार जाहीर सभा होणार होत्या. त्यासाठी अजित पवारांच्या विमानाने सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी मुंबईतून टेक ऑफ केलं होतं. त्यानंतर पुढच्या ४० मनिटात हे विमान बारामतीला पोहचलं. हे विमान बारामती एमआयडीसीतील विमानतळावर लँडिंग करत असताना धावपट्टीवरून काही अंतर दूर जाऊन क्रॅश झालं. यावेळी मोठा स्फोट झाला. सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुंबई पीएसओ HC विदीप जाधव,पायलट कॅप्टन सुमित कपूर,कॅप्टन संभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी या पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. अजित पवार यांच्या अकाली एक्झीटने अवघा महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे. दादांचा सेन्स ऑफ ह्युमर आता महाराष्ट्राच्या राजकारणात दिसणार नाही. अजित पवार यांच्या अकाली निधनाने पवार कुटुंबासह महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे.
सदैव वेळ पाळणारे दादा वेळेआधीच गेल्याची भावना महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या तोंडून व्यक्त होत आहे. 22 जुलै १९५९ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा गावात झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे मोठे भाऊ अनंतराव पवार यांचे ते पुत्र होते. अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांचा आदर्श घेत राजकारणात पाऊल ठेवले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा दादा माणूस निघून गेल्याची भावना आहे. महाराष्ट्राचे राजकारण अजित पवार यांच्या अकाली निधनाने बेचव झाले आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर आहे, त्यांनी सहा वेळा हे पद भूषवले. आपल्या भाषणात आपला रेकॉर्ड कोणी मोडू शकणार नाही असं ते अभिमानाने सांगत. नोव्हेंबर २०१० मध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची पहिली शपथ घेतली. त्यानंतर डिसेंबर २०१२ ला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दुसऱ्यांदा अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर नोव्हेंबर २०१९ ला पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेला त्यांचा शपथविधी गाजला होता. त्यानंतर डिसेंबर २०१९ मध्ये अजित पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर जुलै २०२३ ला त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर डिसेंबर २०२४ ला पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सहा वेळा त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवलं.
आज (२८ जानेवारी २०२६) उपमुख्यमंत्री असतानाच त्यांचे विमान अपघातात निधन झाले. अजितदादांचे आज रोजी वय ६६ वर्ष, महिने व ६ दिवस इतके होते. हा विचित्र योगायोग त्यांच्या वाट्याला आला. अजित दादांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. आज नियतीच्या घड्याळाची वेळ चुकली. नेहमी वेळ पाळणारे दादा वेळेआधीच साथ सोडून निघून गेले. अजित पवारांचे पार्थिव आज रात्री उशिरापर्यंत विद्या प्रतिष्ठान, विद्या नगरी चौक येथे अंतिमदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या (दि. 29) सकाळी 11 वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.