Anil Patil, Vijaykumar Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Nandurabar : भाजपचं हक्काचं ताट अजितदादांनी हिसकावलं; नंदुरबारबाबत महायुतीत नेमकं काय झालं?

कैलास शिंदे

Nandurbar Political News : महायुती सरकारने बुधवारी नव्याने पालकमंत्रिपदांची यादी जाहीर केली आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचा वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित यांना हटवून त्या ठिकाणी अजित पवार गटाचे अनिल पाटील यांची वर्णी लागली आहे. या ठिकाणी अजितदादा व शिंदे गटाचा दबाव प्रभावी ठरल्याचे बोलले जात आहे. (Latest Political News)

राज्यात नंदुरबार (Nandurbar) हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. राज्याचे आदिवासी विकासमंत्री भाजपचे विजयकुमार गावित याच मतदारसंघाचे आमदार आहेत. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर गावितांना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले. याच लोकसभा मदारसंघांत गावितांच्या कन्या डॉ. हीना गावित भाजपच्या खासदार आहेत. जिल्ह्यात गावित यांची चांगली राजकीय पकड आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असतानाही त्या पक्षाचे जिल्ह्यात वर्चस्व होते.

आता ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात भाजप मजबूत आहे. असे असतानाही डॉ. विजयकुमार गावितांना पालकमंत्रिपदावरून हटवले. त्यांच्या जागी अजित पवार गटाचे अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना संधी दिली गेली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अजित पवार (Ajit Pawar) व शिंदे गटाच्या दबावामुळे हे बदल झाल्याची चर्चा आहे. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाची ताकद मोठी आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी या गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख आहेत, तर त्यांचे चिरंजीव राम रघुवंशी शिंदे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख आहेत. अजित पवार गटाचे जिल्हा प्रमुख अभिजित मोरे आहेत. चंद्रकांत रघुवंशी व अभिजित मोरे हे विजयकुमार गावितांचे कायम विरोधक राहिले आहेत. नंदुरबार पालिका निवडणुकीत रघुवंशी यांनी विजयकुमार गावित यांना पराभूत केलेले आहे. रघुवंशी हे मूळ काँग्रेस पक्षाचे असून, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना फुटल्यानंतर ते शिंदे गटात गेले, तर अभिजित मोरे मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे असून, सध्या अजितदादांसोबत आहेत.

सध्या राज्यातील सत्तेत भाजपची युती असली तरी मंत्री विजयकुमार गावित पालकमंत्री म्हणून मित्र पक्षाची कामे करीत नसल्याच्या तक्रारी होत्या. रघुवंशी यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी याबाबत माहिती दिली होतीच. शिवाय अजित पवार गटही त्यांच्यावर नाराज होता. त्यामुळे नंदुरबारचे पालकमंत्री पद अजित पवार गटाकडे द्यावे, या मागणीने जोर धरला होता. त्याला शिंदे गटाचे रघुवंशी यांनीही साथ दिली.

यासह स्वतः अजित पवार यांनीही नंदुरबारचे पालकमंत्रिपद आपल्या गटाला मिळण्याचा आग्रह धराला. या शिवाय अमळनेरचे राजकारण आणि नंदुरबारच्या राजकारणाचा जवळचा संबंध आहे. नंदुरबार येथील शिरीष चौधरी यांनी अमळनेर विधानसभा निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला. २०१९ मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी दिली, परंतु (Anil Patil) अनिल पाटलांनी त्यांचा पराभव केला.

अमळनेरमधून शिरीष चौधरी यांचा पराभव करण्यासाठी चंद्रकांत रघुवंशी यांनी अनिल पाटील यांना मदत केल्याचे सांगण्यात येत आहे. नंदुरबार येथे शिरीष चौधरी हे रघुवंशी यांचे विरोधक आहेत. त्यामुळे अनिल पाटील व रघुवंशी यांचे सख्य असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच आपली कामे करून घेण्यासाठी रघुवंशी यांनी अनिल पाटील यांना पालकमंत्री करण्याची मागणी केल्याचेही सांगण्यात येत आहे. अनिल पाटील पालकमंत्री झाल्यानंतर रघुवंशी यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आता गावित यांना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. परंतु आपला जिल्हा गेल्याने गावित आता काय राजकीय खेळी करणार, याकडेच लक्ष असणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT