Ajit Pawar & Girish Mahajan
Ajit Pawar & Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon News: अजित पवार आज गिरीश महाजनांची खरडपट्टी काढणार?

Sampat Devgire

जळगाव : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आज जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत चाळीसगाव, पाचोरा व जळगाव येथे पक्षाचे (NCP) मेळावे होतील. राज्यात नवे सरकार येऊनही अद्याप पालकमंत्र्यांची नियुक्ती नसल्याने अनेक प्रश्न तीव्र बनले आहेत. गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) दोघेही जिल्ह्याचे नेते असल्याचा दावा करीत असल्याने या प्रश्नांवर अजित पवार त्यांचा समाचार घेण्याची शक्यता आहे. (Gulabrao Patil & Gitish Mahajan both minister not able to solve farmers issues)

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी बुधवारी जिल्ह्याच्या विविध समस्यांची माहिती दिली. विशेषतः केळी उत्पादक तसेच अन्य शेतकऱ्यांना अनेक प्रश्न सतावत आहे. मात्र राज्यातील नव्या सरकारमध्ये ताळमेळ नसल्याने जनतेला वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. राज्याच्या मंत्रीमंडळात जळगावला प्रतिनिधीत्व तर मिळाले, मात्र पालकमंत्री नसल्याने प्रश्न सुटत नाहीत.

महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, जिल्हा उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, इब्राहिम तडवी आदी उपस्थित होते. ॲड. पाटील म्हणाले, की विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे गुरुवारी सकाळी नऊला चाळीसगाव येथे आगमन होईल. राजीव देशमुख यांच्या निवासस्थानी ते कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. त्यानंतर पाचोऱ्यातील गो. से. हायस्कूल येथे जिजाई रगमंच उद्‍घाटन कार्यक्रमास उपस्थित राहतील. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. शेठ मुरलीधर मानसिंग विद्यालयाच्या इमारतीचे उद्‍घाटन, पाचोरा भडगाव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस मेळावा होईल. तेथून नांद्रा (ता. पाचोरा)मार्गे पाचोऱ्याहून जळगावकडे प्रयाण करतील.

जळगावात राष्ट्रवादीचा मेळावा

जळगावत दुपारी पावणेतीनला छत्रपती संभाजी महाराज सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा होईल. आमदार एकनाथ खडसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, माजी आमदार डॉ. सतीश पाटील, दिलीप वाघ, तसेच जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, माजी आमदार, आजी, माजी नगरसेवक उपस्थित राहतील.

जिल्ह्यातील प्रश्‍न मांडणार

ॲड. पाटील म्हणाले, की श्री. पवार यांच्याकडे पक्षातर्फे जिल्ह्यातील प्रश्‍न मांडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या केळी पिकावर पडलेल्या सी.एम.व्ही. रोगावर मार्गदर्शन केले जात नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यासाठी उपायायोजना व्हावी, लम्पी रोगाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे, तसेच त्याचे लसीकरण करण्यात यावे, जनावरे मृत झालेल्या शेतकऱ्यांना ३५ हजार रुपये मदत द्यावी, तसेच शासकीय धान्य खरेदी तातडीने सुरू करावीस अशी मागणी करण्यात येणार आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT