Rohit Pawar, Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar : अजितदादांच्या अपघातावरुन राजकारणाचा 'र', रोहित पवारांचा विखे पाटलांवर पलटवार

Rohit Pawar On Radhakrishna Vikhe Patil : रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांच्या अपघाताचे राजकारण केले जात असल्याचा आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता. रोहित पवारांनी त्यावर विखेंना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राज्याचं राजकारण तापले आहे. २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर अजित पवार यांचे अपघाती निधन झालं तेव्हा आख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. मात्र त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप–प्रत्यारोपांना जे उधाण आलं ते थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार व दिवंगत नेते अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या निधनावर घातपाताचा संशय व्यक्त करत घेतलेल्या पत्रकार परिषदांमुळे नवा वाद निर्माण झाला होता. 10 फेब्रुवारी आणि 18 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी विमान अपघाताच्या चौकशीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांवर 'राजकारण करत असल्याचा' आरोप केला. त्याला रोहित पवारांनी एक्स पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं आहे.

रोहित पवार यांनी एक्स पोस्ट मध्ये म्हटले आहे की, ज्येष्ठ नेते विखे-पाटील साहेब यांनी केलेलं विधान अत्यंत क्लेशदायक, आश्चर्यकारक आणि बेजबाबदार आहे. अजिदादांसारखा दुर्दैवी प्रसंग कधीच कुणाच्याही कुटुंबावर ओढवू नये... वेदना काय असते ती ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अजितदादांच्या अपघाताच्या विषयावर मी राजकारणाचा ‘र’ शब्दही उच्चारला नसताना विखे पाटील साहेब ओढून ताणून या विषयाला राजकारणाशी जोडून विमान अपघाताच्या चौकशीला वेगळं वळण तर देत नाहीत ना? काठावर बसून त्यांना आमच्या दुःखाची धग कळणार नाही, त्यामुळं त्यांनी किमान या विषयाला वेगळे फाटे तरी फोडू नयेत, अशी माझी त्यांना विनंती आहे.

विखे पाटील नेमकं काय म्हणाले होते?

राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले होते की, दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाताबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही DGCA पत्र लिहिले आहे. मात्र तरीही अशा दुर्दैवी प्रकरणात राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे. ते दुर्दैवी आहे. ही फार मोठी दुर्देवी घटना घडली आहे. निश्चितच त्याचं सगळ्यांनाच दुःख झालं आहे. परंतु अशा स्थितीत कुटुंबाला व लोकांना आधार देण्यापेक्षा लोकांचा बुद्धिभेद केला जात आहे. कोण काय म्हणतंय याला फार महत्त्व द्यायला नको. हा सगळा सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार आहे. रोहित पवारांनी आरोप करणं, भानगडी बंद कराव्यात. कुटुंबावर दुःखाचा आघात झाला आहे, त्यामध्ये राजकारण कशाला करता? चौकशी अंती सर्व काही पुढे येईल. असे विखे पाटील यांनी म्हटले होते.

विखे पाटील यांच्या याच टीकेवर रोहित पवार यांनी पलटवार करत त्यांना प्रत्युतर दिलं आहे. त्यामुळे एकप्रकारे रोहित पवार व विखे पाटील या दोघांमध्ये याप्रकरणावरुन जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT