Ajit Pawar & Devendra Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar politics: अजित पवारांनी मोहन भागवतांचा दावा खोडला, अगदी फडणवीसांच्या उपस्थितीतच!

Sampat Devgire

Ajit Pawar News: महात्मा फुले दांपत्याच्या सर्वात मोठ्या अर्ध पुतळ्याचे लोकार्पण शनिवारी नाशिक मध्ये झाले. या कार्यक्रमात एक अनोखी बाब घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने नाशिकच्या मुंबई नाका वाहतूक बेटावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण शनिवारी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्याला उपस्थित होते.

महात्मा फुले यांच्याशी संबंधित कार्यक्रम असल्याने उपस्थित नेत्यांनी बहुजन समाज आणि समतेचा विचार याला सुसंगत अशीच भाषणे केली. त्यात चर्चेचा विषय ठरला, तो उपमुख्यमंत्री पवार यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा. त्याला संदर्भ होता महिन्याभरापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या एका वक्तव्याचा.

श्री. भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी लोकमान्य टिळक यांनी शोधली होती, असा दावा केला होता. त्यावरून मोठा गहजब देखील झाला. अनेकांनी या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यात मंत्री भुजबळ यांच्याशी संबंधीत कार्यकर्तेही होते.

शनिवारी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुले यांच्या विषयी काही माहिती सांगितली. ते म्हणाले, १८८० मध्ये महात्मा ज्योतिबा फुले पुण्याहून पायी चालत रायगडावर गेले होते. तेव्हा त्यांनी तेथे झाडाझुडपात हरवलेली आणि पालापाचोळ्यात झाकलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली.

रायगडावरील या परिसराची साफ सफाई केली. समाधी पाण्याने धुतली. पूजा करून फुले वाहिली. त्यानंतर महात्मा फुले पुण्यात आल्यावर देखील त्यांनी यासंदर्भात काम केले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा निर्णय महात्मा फुलेंनी घेतला होता. असे देखील पवार यांनी सांगितले.

महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधल्यानंतर पुण्याच्या हिराबागेत एक सभा घेतली. या सभेत पहिल्यांदा शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. तो एकमताने मंजूर झाला. त्यासाठी सत्तावीस रुपये वर्गणी जमा झाली. त्यातील तीन रुपये महात्मा फुले यांनी दिले होते.

हा सर्व संदर्भ ऐतिहासिक कागदपत्रांतून पुढे आला आहे. हे मी माझ्या मनातले सांगत नाही, असे सूचक वाक्यही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी वापरले. विशेष म्हणजे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर उपस्थित होते.

भर सभेत अप्रत्यक्षरीत्या उपमुख्यमंत्री पवार यांनी फडणवीस यांनाच तर हे सुनावले नाही ना? असा प्रश्न उपस्थितांच्या मनात निर्माण झाला असावा. यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी बाबतचा दावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीतच अजित पवार यांनी खोडून काढला.

हे सर्व ऐकताना संघाचे एकनिष्ठ स्वयंसेवक असलेले उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मनात काय भावना तरळल्या असतील, हे त्यांनाच माहित. उपमुख्यमंत्री पवार सध्या भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीत आहेत. तरीही त्यांना फुले, शाहू, आंबेडकरांचा राजकीय विचार सोडता येणार नाही. हे देखील तेवढेच सत्य आहे.

या स्थितीत उपमुख्यमंत्री पवार यांचा भाजपच्या नेतृत्वाखाली होणारा वैचारिक कोंडमारा तर होत नाही ना, असा प्रश्न पडतो. यानिमित्ताने महात्मा फुले दांपत्याच्या पुतळ्याच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार यांच्या विधानाची चर्चा कार्यक्रमानंतरही होत राहिली.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT