Heena Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr Heena Gavit Politics: भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या विरोधकांना हिना गावितांनी सुनावले, 'सत्तेत महाविकास आघाडी, केसी पाडवी...'

Sampat Devgire

Dr Heena Gavit News : नंदुरबार जिल्ह्यातील 'जलजीवन मिशन' योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यामध्ये गावित कुटुंबीयांची चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. भ्रष्टाचाराच्या विरोधात माजी मंत्री के सी पाडवी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन झाले होते. त्यात विविध पक्षांचे नेते सहभागी झाले होते. मात्र या सगळ्या आरोपांना माजी खासदार डॉ हिना गावित यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

'विरोधकांचा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. जनता त्याला भीक घालणार नाही, या शब्दांत डाॅ. हिना गावित आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुप्रिया गावित यांनी सडेतोड उत्तर देत विरोधकांच्या आंदोलनाचा समाचार घेतला.

डॉ. गावित म्हणाल्या, जलजीवन मिशन 2021 मध्ये मंजूर झाली आहेत. त्यावेळी राज्यात काँग्रेसचा सहभाग असलेले महाविकास आघाडीचे सरकार होते. के. सी. पाडवी हे मंत्री होते. जिल्हा परिषदेत शिवसेना आणि काँग्रेस यांची सत्ता होती. मंत्री के. सी. पाडवी यांच्या पुढाकाराने ही सर्व कामे मंजूर झाली आहेत. वादग्रस्त कार्यकारी अभियंता बाविस्कर हे पाडवी यांच्या गळ्यातला तावीत होते. या कार्यकारी अभियंता बाविस्कर यांच्या मर्जीतील संस्थेनेच सर्वेक्षण केले.

त्यानंतर कामे मंजूर केली. ती कामे वादग्रस्त निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदारांना दिली. यातील अनेक कंत्राटदार सापडत नाहीत. योजनेची कामे निकृष्ट असतील किंवा त्यात गैरव्यवहार झाला असेल तर तो तुमचाच आहे. तुमच्याच कारकिर्दीत झालेला आहे. तुमच्या कारकिर्दीत तुम्ही मंजूर केलेली कामे आहेत. ती कामे भारतीय जनता पक्षाच्या सत्ता काळातील आहेत, असे भासवून गावित यांची बदनामी करू नका. असा थेट इशारा त्यांनी काँग्रेसचे आमदार के सी पाडवी आणि खासदार गोवाल पाडवी यांच्यासह आंदोलन करणाऱ्या नेत्यांना दिला.

या संदर्भात गावित यांनी जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या कामांची यादीच सादर केली. या कामांना 2021 आणि 2022 या कालावधीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ही कामे भाजपची नसून काँग्रेसच्या सत्ता काळातील आहेत. त्याची जबाबदारी आणि आरोप गावित यांच्यावर करणे हे बेजबाबदारपणाचे आहे, अशी टीकाही हिना गावीत यांनी केली.

विरोधकांनी केलेले आरोप

नंदुरबार जिल्हा परिषदेत जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला. यातील 90 टक्के कामे अपूर्ण आहेत. कंत्राटदार पळून गेले आहेत. या योजनांच्या मंजुरीत घोटाळा झाला आहे. अत्यंत निकृष्ट काम झाल्याने त्याचा नागरिकांना काहीही लाभ झाला नाही. या भ्रष्टाचारात गावित कुटुंबीय सहभागी आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT