Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडीओ एक्स'वर शेअर करत राज्यात खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडीओत कोकाटे विधानसभेच्या सभागृहात पावसाळी अधिवेशन सुरु असताना चक्क रमी खेळत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. एकीकडे राज्यात शेतकरी आत्महत्या करत असताना कृषीमंत्र्यांचा असा व्हिडीओ समोर आल्याने पुन्हा एकदा महायुती सरकारला कोंडीत पकडण्याची संधी विरोधी पक्षांना मिळाली आहे. विरोधकांनी कोकाटेंवर टीकेची झोड उठवली आहे.
त्यातच आता या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना एक मोठा दावा केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी महाराष्ट्रातील चार ते पाच मंत्र्यांना डच्चू देण्याचं ठरवलं आहे. त्यात माणिकराव कोकाटे यांचेही नाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संजय राऊतांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
संजय राऊत म्हणाले, सरकारमधील कुणाचे व्हिडीओ पैशांच्या बॅगांसोबत येत आहेत, कुणी रमी खेळतंय, कुणी आमदार निवासात मारामाऱ्या करतंय, अशी राज्याची परिस्थिती आहे. माझ्या माहितीप्रमाणे अमित शाह यांनी राज्यातील चार ते पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत. त्यात कृषिमंत्र्याचे देखील नाव आहे अशी माझ्याकडे पक्की माहिती आहे. त्यात एकनाथ शिंदे यांनाही त्यांच्या मंत्र्यासंदर्भात या सूचना केल्या आहेत असं राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले केंद्रातील सरकार दुटप्पी आणि ढोंगी आहे. छत्तीसगड मधील अनेक राजकीय नेत्यांवर ऑनलाइन गेमिंग संदर्भात कारवाई झाली. भूपेश बघेल माजी काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या चिरंजीवाला देखील ईडीने अटक केली. पण अशाच प्रकारचे गुन्हे महाराष्ट्रातले राजकारणी करत आहेत. सत्ताधारी करत आहेत. त्यांचा ऑनलाईन गेमिंगच्या पैशांमध्ये मोठा सहभाग आहे. मात्र, त्यांच्यावर ईडीने किंवा सीबीआयने कुठलीही कारवाई केली नाही. जी छत्तीसगड, झारखंड, किंवा दिल्लीतल्या अनेक उद्योगपती आणि राजकारण्यांवर केली आहे. हा दुटप्पीपणाच आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
दरम्यान, मुंबईतल्या एका वकिलाने राज ठाकरे यांच्याविरोधात सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांच्यावर एफआयआर दाखल करा अशी मागणी त्यातून करण्यात आली आहे. त्याविषयी विचारले असता राऊत म्हणाले, याचिका म्हणजे आमच्यासाठी पदके आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानी नेत्यांकडे अशी पदके असायला हवीत. ठाकरेंना गुन्हे, याचिका, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट हे काही नवीन नाही. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे असतील यांच्यासाठी हे नवीन नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी भूमिका मांडल्याबद्दल याचिका दाखल केल्या जातात. याचिकेचा बाऊ करण्याची गरज नाही असं राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.