Anna Hazare Protest Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anna Hazare Protest : दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज; आता अण्णा हजारे मैदानात, आंदोलनाचे हत्यार उपसले, पंतप्रधानांना धाडले पत्र

Anna Hazare announces silent protest backing student movement in Ahilyanagar : अण्णा हजारे अहिल्यानगरातील वाडिया पार्क येथील गांधी स्मारक येथे दोन तासांचे मौन आंदोलन करणार आहेत.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही विविध ठिकाणी समर्थनाचे आंदोलन सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत अहिल्यानगरात मौन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

अण्णा हजारे (Anna Hazare) गुरुवारी (24 जुलै) सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत अहिल्यानगरातील वाडिया पार्क येथील महात्मा गांधी स्मारक येथे दोन तासांचे मौन आंदोलन करणार आहेत. या आंदोलनस्थळाला प्रतीकात्मक स्वरूपात "अहिल्यानगरचे जंतरमंतर" असे नाव देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

दिल्लीत नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी (Student) आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधूराचा वापर केल्याच्या घटनांवर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.

या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रश्न सोडवावेत, अशी भूमिका मांडली आहे. लोकशाही व्यवस्थेत संवादाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

लाठीचार्जवर सुरूवातीला अण्णांची भूमिका

यापूर्वी दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जबाबत अण्णा हजारे यांनी, संपूर्ण घटनेची माहिती नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका व्यक्त केली होती. मात्र आता त्यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मौन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

अण्णांविषयी दिपकेंचे विधान चर्चेत

दरम्यान, काही दिवसांपूर्वी 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी अण्णा हजारे यांच्या वय आणि नेतृत्वाबाबत केलेल्या विधानाचीही चर्चा झाली होती. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ज्येष्ठ नेत्यांनी सामाजिक आणि राजकीय चळवळींमधून निवृत्त होऊन युवा पिढीला नेतृत्वाची संधी द्यावी, असे मत व्यक्त केले होते.

अण्णांच्या आंदोलनाकडे लक्ष

अण्णा हजारे यांच्या मौन आंदोलनामुळे विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अण्णा हजारेंचे पंतप्रधानांना पत्र

लोकशाहीत जनतेचा आवाज दडपण्याऐवजी संवादातून प्रश्न सोडवा, अशी मागणी करणारे पत्र अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. मंत्र्याचा राजीनामा घेतला म्हणून सरकारची सत्ता जात नाही. सोनम वांगचुक यांना हटविण्याची पद्धत लोकशाहीच्या भावनेला धरून नसल्याची टीका अण्णांनी पत्राद्वारे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT