Maharashtra RTI rules controversy : महाराष्ट्रातील महायुती सरकारने माहितीचा अधिकार (RTI) नियमांमध्ये केलेल्या नव्या दुरुस्त्यांवरून आता मोठा वाद निर्माण झाला असून, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
सरकारने नागरिकविरोधी तरतुदी तात्काळ रद्द कराव्यात, अन्यथा 5 जुलैपासून बेमुदत उपोषणाला बसणार, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
या संदर्भात अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा एकदा पत्र पाठवत आपल्या मागण्यांची आठवण करून दिली आहे. यामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे.
अण्णा हजारे यांनी यापूर्वी 22 जून रोजी सरकारला पत्र पाठवून, नव्या नियमांमुळे नागरिकांच्या माहिती मिळवण्याच्या मूलभूत अधिकारावर मर्यादा येत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर 25 जून रोजी अहिल्यानगरच्या (Ahilyanagar) राळेगणसिद्धी येथे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे, पुणे विभागीय आयुक्त मकरंद रानडे आणि छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त प्रकाश इंदलकर यांनी अण्णा हजारेंची भेट घेत जवळपास अडीच तास चर्चा केली.
या बैठकीत अधिकाऱ्यांनी, तुमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवू. अंतिम निर्णय सरकारलाच घ्यावा लागेल, असे आश्वासन दिले होते. मात्र आज पुन्हा पाठवलेल्या पत्रात हजारे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, नवीन नियमावलीमुळे माहिती अधिकार कायदा कमकुवत झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
हजारे यांनी इशारा देताना म्हटले की, माहिती अधिकार कायदा वाचवण्यासाठी आता प्राणपणाने लढावे लागेल. सरकारने दुरुस्त्या मागे घेतल्या नाहीत तर बेमुदत उपोषण अपरिहार्य आहे. दरम्यान, या दुरुस्त्यांविरोधात राज्यभर आंदोलन उभारण्याची तयारीही सुरू झाली आहे. लोक आंदोलन न्यासच्या कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी सांगितले की, सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभर जनजागृती मोहीम राबवली जाणार असून आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल.
त्याचबरोबर या नियमांविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गडचिरोली येथे आयोजित संघटन बांधणी सभेत बोलताना इनामदार यांनी विदर्भ दौऱ्याची सुरुवात केली असून गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि अमरावती येथे बैठका घेण्यात येणार आहेत.
या बैठकीला लोक आंदोलनाचे राष्ट्रीय खजिनदार दत्ता आवारी, विश्वस्त अन्सार शेख, जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, डॉ. अनंता कुंभारे, माजी अध्यक्ष चंद्रशेखर भडांगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. राज्य सरकारच्या RTI नियमांवरील या निर्णयामुळे आता महाराष्ट्रात मोठे जनआंदोलन उभे राहण्याची चिन्हे दिसत असून, अण्णा हजारेंच्या उपोषणाच्या इशाऱ्यामुळे सरकारची कोंडी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.