Asif Shaikh & Ramgiri Maharaj Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Asif Shaikh Politics: असिफ शेख यांचा आरोप, रामगिरी महाराज यांच्या मागे भाजप!

Sampat Devgire

Ramgiri Maharaj News: मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य रामगिरी महाराज यांनी केले. या वक्तव्याचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. विविध संघटनांनी रामगिरी यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.

पांचाळे (सिन्नर) येथे नुकताच हरिनाम सप्ताह झाला. यावेळी सरला बेट (कोपरगाव) येथील रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजा विरोधात आक्षेपार्ह विधान केले. त्या विरोधात नाशिकसह राज्याच्या विविध ठिकाणी तीव्र निदर्शने झाली.

रामगिरी महाराज यांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी करण्यात आल्या आहेत. मालेगाव शहर पोलीस ठाण्यात माजी आमदार असिफ शेख यांच्या पुढाकाराने तक्रार करण्यात आली. यावेळी शेकडो समाज बांधवांनी निदर्शने करीत रामगिरी महाराज यांचा निषेध केला.

या संदर्भात माजी आमदार शेख यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पोलीस उपअधीक्षक तेगबीरसिंग यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शेख यांनी रामगिरी यांच्याबाबत गंभीर आरोप केला. रामगिरी महाराज यांचे विधान राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा त्यांनी केला.

बांगलादेशातील अल्पसंख्यांक आणि हिंदू समाजावर सामूहिक अत्याचार होत आहेत. या घटनेचा प्रत्येकाने निषेध केला आहे. मात्र हे करताना भारत सरकारने शेख हसीना यांना आश्रय का दिला? असा प्रश्न माजी आमदार शेख यांनी केला.

एकीकडे सरकारने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आश्रय द्यायचा. दुसरीकडे सरकारच्या समर्थकांनी 'सकल हिंदू समाज' या नावाखाली आंदोलने करायची. हे दुटप्पी धोरण आहे. रामगिरी महाराज यांनी केलेल्या विधानाला देखील भारतीय जनता पक्षाची फूस असावी, असे दिसते.

भाजपाच्या अनेक नेत्यांचे रामगिरी महाराज यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. राज्य सरकारमधील नेत्यांचा त्यांना आशीर्वाद आहे. या संरक्षणाशिवाय रामगिरी महाराज असे राजकारणाला खतपाणी घालणारे विधान करू शकणार नाही, असा दावा माजी आमदार शेख यांनी केला.

रामगिरी महाराज हे भारतीय जनता पक्षाचे संत आहेत. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेख यांनी केली.

दोन दिवसांपासून नाशिक, मालेगाव, मनमाड, औरंगाबाद अशा विविध शहरात रामगिरी महाराज यांच्या विधानावरून वातावरण तापले आहे. पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. हे वातावरण निवळण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे रामगिरी महाराज यांच्याबाबत काय भूमिका घेतली जाते, याची उत्सुकता आहे.

बांगलादेशतील अल्पसंख्यांक हिंदू समाजाला सामूहिकपणे लक्ष्य केले जात आहे. त्या विरोधात नाशिकमध्ये बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याच दिवशी रामगिरी महाराज यांनी हे विधान केले. हा योगायोग की जाणीवपूर्वक केलेले विधान अशी ही चर्चा सुरू आहे.

या सर्व घडामोडींमुळे पोलीस यंत्रणेवर मात्र अवाजवी तान निर्माण झाला. यात शांतता प्रस्थापित करण्यात पोलीस यशस्वी झाले, हीच एक दिलासादायक बाब आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT