Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat : केंद्रातील भाजपची घमेंड महाराष्ट्राने उतरवली; थोरातांनी फसव्या योजनांवर घावच घातला

Pradeep Pendhare

Ahmednagar News : "विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असेल, असे सांगत केंद्रातील भाजप सरकारची घमेंड महाराष्ट्राने उतरवली. राज्यात महायुती सरकारच्या घोषणा फसव्या असून, त्यांना भुलू नका आणि फसू नका", असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या फसव्या राजकारणावर हल्ला चढवला.

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संगमनेरच्या चंदनापुरीमधील 5 कोटी 27 लाखांच्या कामांचं लोकार्पण झालं. आमदार थोरात यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप युती सरकारवर जोरदार निशाणा साधला. महाविकास आघाडीतून काँग्रेस (Congress) महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सत्तेत नसलो म्हणून काय झालं, महाविकास आघाडीतील प्रत्येक आमदार त्यांच्या मतदारसंघात विकास कामांवर प्रयत्न करताना दिसतोय. यातून विधानसभेत महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार बसताना पाहतोय, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

केंद्रातील भाजप (BJP) सरकारची घमेंड कोणी उतरवली असेल, तर ती महाराष्ट्राने उतरवली. केंद्रातील भाजप सरकारने स्वायत्त असलेल्या ईडी, सीबीआय सारख्या संस्थांना गुलाम बनवलं. त्यातून दबावाचं राजकारण केलं. महागाई, बेरोजगारी, शेती प्रश्नांकडे दुर्लक्ष करत दबावाचे, जाती, धर्माचे, ईडी, सीबीआयच्या माध्यमातून देशातील राजकारणाचा वेगळा रंगमंच भाजपने सेट केला होता. जातिभेद, घमेंड असणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारला रोखण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने केल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

राज्यातील महायुतीचे सरकार कसे आले हे, सर्वश्रुत आहे. जनतेलाच हे सरकार मान्य नाही. महायुतीने हे सरकार लादलेले आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेचा कौल महाविकास आघाडीकडे असणार असल्याचा दावा बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. राज्यात शरदचंद्र पवार ,उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आपल्याला मान मिळतो आहे हे जनतेचे प्रेम असून आगामी काळामध्ये सर्वांनी एकजुटीने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही थोरात यांनी केले. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार सुधीर तांबे, जयश्री थोरात, मिलिंद कानवडे यांची यावेळी भाषणं झाली. लहानू गुंजाळ, अमर कतारी,संजय फड,दिलीप साळगट, संघर्ष प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाळासाहेबांचे नाव मुख्यमंत्रपदासाठी सर्वात पुढे

काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये फक्त विकासाचे राजकारण केले. त्यामुळे संगमनेर हा मतदारसंघाकडे ते कुटुंब म्हणूनच बघतात आणि आता संगमनेरकरांसाठी देखील ते कुटुंबप्रमुख झाले आहेत. राज्यात देखील मनाने मोठे असलेले नेते म्हणून बाळासाहेब थोरात यांच्याकडे बघितले जाते. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या नावाच्या चर्चेत बाळासाहेब यांचे नाव पुढे असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT