BJP Nashik Politics Devendra Fadnavis Meeting News : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘भक्ती संगम’ कार्यक्रमाचा समारोप ३० ऑगस्ट रोजी हभप श्री. इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनाने झाला.
तीन दिवस विविध कार्यक्रम झाले. नाशिककरांनीही या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद दिला. मात्र, हा सोहळा एका कारणाने चर्चेत आला ते म्हणजे, कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी उद्घाटनाला नाशिककरांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सहाहून अधिक मंत्री कार्यक्रमाला उपस्थित असतानाही सभागृहातील निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या.
दोन हजार आसनक्षमता असलेल्या सभागृहात मोठ्या प्रमाणात खुर्च्या रिकाम्या राहिल्याने कुंभमेळा प्राधिकरणाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. फडणवीस पुढे बोलत आहेत, आणि मागे सगळ्या खूर्च्या रिकाम्या आहेत असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. विरोधकांनाही सत्ताधाऱ्यांवर टीका करायला यातून आयती संधी मिळाली.
मात्र, यात एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे ती म्हणजे, उद्घाटनाचा कार्यक्रम वगळता उर्वरित सगळ्या कार्यक्रमांना नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिला. मग साहजिकच मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्याची जबाबदारी ही कुंभमेळा प्राधिकरणाची होती का? तर याचं स्पष्ट उत्तर नाही असं आहे. तर, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्याची जबाबदारी भाजपचे नगरसेवक, आमदार व पदाधिकाऱ्यांची होती. कारण त्यांच्या राज्यातील प्रमुख नेत्याच्या हस्ते उद्घाटन होणार होतं.
खरेतर शहरात भाजपचे ३ आमदार आहेत. ७२ नगरसेवक आहेत. यांनी ठरवलं असतं तर मुख्यमंत्र्यांच्या सभेला आसनक्षमतेपेक्षाही अधिक गर्दी होऊ शकली असती. नियमाने मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींचीच होती.
परंतु, भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांची कुंभमेळा प्राधिकरणावर नाराजी आहे. कुंभमेळा प्राधिकरण लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही अशी तक्रार खुद्द भाजपच्या शहराध्यक्षांनी केली. प्राधिकरणाच्या वतीने आयोजित सभेत अधिकारी वेळेवर उपस्थितीत न राहिल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. त्यातून प्राधिकरण व नगसेवक यांच्यातील मतभेद उघड चव्हाट्यावर आलेले दिसले. याच नाराजीच्या मानसिकतेतून प्राधिकरणाला धडा शिकवण्याच्या प्रयत्न करण्यात आला का? त्याचाच फटका मुख्यमंत्र्यांच्या सभेला बसल्याचे निष्कर्ष आता काढले जाऊ लागले आहेत.
यासंदर्भात महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी स्पष्ट केलं की, मुळात 'भक्ती संगम' कार्यक्रम सिंहस्थ प्राधिकरणाचा होता. या कार्यक्रमासाठी साधू-महंतांसह विशिष्ट निमंत्रितांनाच आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी पास देण्यात आले होते. तसेच जास्तीच्या खुर्ध्या रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ठेवल्या होत्या.
महापौरांच्या स्पष्टीकरणामुळे या प्रकरणातील आणखी एक बाजू समोर येते. जर कार्यक्रमासाठी केवळ निमंत्रितांनाच पास देण्यात आले होते आणि उर्वरित आसनव्यवस्था सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी करण्यात आली होती. मात्र, उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यातील प्रमुख नेते उपस्थित असताना सभागृहातील मोठ्या प्रमाणावरील रिकाम्या खुर्च्यांचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्याचा राजकीय संदेश मात्र वेगळा गेला.
त्यामुळे प्रश्न केवळ ‘गर्दी का झाली नाही?’ एवढाच नाही, तर कुंभमेळ्यासारख्या मोठ्या आयोजनात प्रशासन, प्राधिकरण आणि स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय किती आहे, हाही आहे. कारण आगामी काळात सिंहस्थाच्या निमित्ताने असे अनेक मोठे कार्यक्रम होणार आहेत. त्यावेळी राजकीय मतभेद आणि प्रशासकीय नियोजन यांचा परिणाम थेट कार्यक्रमाच्या प्रतिमेवर होऊ नये, याची काळजी घेणे दोन्ही बाजूंसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.