Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackeray : 'भाजपात आज भ्रष्टाचाऱ्यांना मान, पण शंकराचार्यांना नाही' ; उद्धव ठाकरेंचा घणाघात!

Mayur Ratnaparkhe

Nashik News : शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी नाशिक येथील जाहीर सभेतून, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली. हिंदुत्वाच्या मुद्य्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपला जाहीर प्रश्न विचारले. शिवाय, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरूनही निशाणा साधला.

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले, 'बाबरी पाडण्यात शिवसेनेचं योगदान काय हे आज विचारलं जात आहे. एवढच नाही तर आता तर काही असे बिनडोक लोक निघाले आहेत, की हिंदू धर्मासाठी शंकाराचार्यांचं योगदान काय? असं विचारत आहेत. मला भाजपला प्रश्न विचारायचा आहे, कोणी जरी सनातन धर्मावर बोलले तर तुमची तळपायाची आग मस्तकात जाते. तुम्ही सनातन धर्म मानतात की नाही, हे मला भाजपने सांगावं आणि जर सनातन धर्म तुम्ही मानत असाल, तर तुमच्या पक्षात जे आज बाजारबुंडगे, आयाराम भरलेले आहेत भ्रष्टाचारी, घोटाळेबाज हे सगळे तुम्ही तुमच्या पक्षात घेतले. मग मी असं म्हणू का की भाजपात आज भ्रष्टाचाऱ्यांना मान आहे पण शंकराचार्यांना नाही.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय 'शिवसेनाप्रमुख आपल्याल शिकवून गेले की शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा. अगोदर गेल्या तेवढ्या शेळ्या खूप झाल्या, आणखी कुणी असेल तर आताच मिंध्यांकडे निघून जा. मला आश्चर्य वाटतं, केळ हिंदू, हिंदुत्व आणि सनातन धर्म हे केवळ बोलणाऱ्या भाजपकडे भ्रष्टाचाऱ्यांना पटवण्यासाठी खोके आहेत, सगळी पदं आहेत. परंतु धर्माची शिकवण देणाऱ्या शंकाराचार्यांना तुम्हाला भेटण्याची तसदी घेण्यासही वेळ नाही. हा कोणता तुमचा हिंदू धर्म आहे?'असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.

याचबरोबर 'अशी काय एवढी घाई झाली होती, आम्हालाही घाई होतीच. परंतु रामनवमीपर्यंत तुम्ही थांबला असता तर आम्ही तुम्हाला घाई केली नसती. आम्ही हा विषय केव्हाच घेतला होता आणि म्हणूनच आम्ही भाजपला पाठिंबा दिला होता. राम मंदिर बनवण्यासाठी आम्ही भाजपला पाठिंबा दिलाच होता, हे मी जाहीर सांगतोय.

काश्मीरमधील 370 कलम काढण्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलाच होता. हिंदूंचं रक्षण करण्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलाच होता. पण जेव्हा कठीण काळ होता त्यावेळी शिवसेनेची सोबत तुम्हाला लागली. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा यांना केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते, तेव्हा तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी मदत केली. तीच शिवसेना आज तुम्ही संपवायला निघालात? हेच का तुमचं हिंदुत्व? ' अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT