Chhagan Bhujbal, Amruta Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Vs Bhujbal : भुजबळांना मतदारसंघातच 'पाणी' दाखवण्यासाठी भाजपच्या पवारांनी वापरलं 'बळ'

Sampat Devgire

Nashik Political News :

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळांच्या मतदारसंघात महायुतीत गृहयुद्धाला सुरुवात झाली आहे. भुजबळांच्या येवला मतदारसंघात पाण्याच्या प्रश्नावरून भाजप आक्रमक झाली असून हा एक प्रकारे भुजबळांना (Chhagan Bhujbal) आव्हान देण्याचा प्रकार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पालखेड कालव्यावरील चारी क्रमांक 25 आणि 28 येथे शेतकऱ्यांवर पाणी देण्यात अन्याय होत असल्याने या चारी फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करून त्यांना अटक करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून यंत्रणेवर दबाव आणण्यात आला. सर्व रहिवाशांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. भाजपच्या नेत्या अमृता पवार (BJP Leader Amruta Pawar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियादेखील सुरू आली होती. मात्र ग्रामस्थांच्या विरोधामुळे पोलिसांनी माघार घेत गुन्हा दाखल करण्याचे टाळले.

पालखेड धरणाचे रोटेशन सोडल्याने रहिवाशांना पाणी मिळावे, यासाठी भाजप (BJP) नेत्या अमृता पवार आठवडाभर पाटबंधारे विभाग प्रशासनाच्या संपर्कात आहेत. त्यांनी पाण्याची मागणी करणाऱ्या गावांमध्ये दौरे करून ग्रामस्थांना पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न केले आहेत. या विषयावरून अनेक भागांत राजकारण पेटले असून ठिकठिकाणी ग्रामस्थांनी उपोषण केले आहेत. त्यामुळे सध्या रहिवासी आणि पाटबंधारे विभागात तणाव निर्माण झाला आहे.

गेल्या आठवड्यात पाटबंधारे विभागाने नाशिकचे (Nashik) पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या सूचनेनुसार येवला मतदारसंघात पालखेड धरणाच्या चाऱ्यांना पिण्यासाठी पाणी सोडले. मात्र असे करताना दुजाभाव होत असल्याने ग्रामस्थ संतापले अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी आधी मागणी नोंदवून आणि शुल्क भरूनदेखील त्यांना पाणी मिळू नये, म्हणून काही राजकीय यंत्रणा काम करीत असल्याचा आरोप होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ठिकठिकाणी उपोषण केले. त्यावेळी भाजपच्या अमृता पवार यांनी मागणी केल्याप्रमाणे आणि नियोजनानुसार प्रत्येक गावाला पाणी मिळाले पाहिजे, असा आग्रह धरत प्रशासनाला धारेवर धरले. त्यामुळे मुदत संपल्यानंतरदेखील चाऱ्यांना पाणी सोडण्याची मुदत वाढवण्यात आली होती.

एकंदरच येवला विधानसभा मतदारसंघात पिण्याच्या पाण्यावरून भाजप नेत्या अमृता पवार आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे सध्या सत्ताधारी महायुतीचे घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप या सहकारी पक्षांतच वाद रंगला आहे. आता हे दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर आरोप करीत असल्याने पाण्याच्या प्रश्नावरून येवला मतदारसंघात पाण्याचे राजकारण तापले आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT