Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bullet Train: फडणवीस म्हणाले, `बुलेट ट्रेन रद्द करणार नाहीच`

Sampat Devgire

मुंबई : पायाभूत सुविधा (Infrastricture) व राष्ट्रीय सकल उत्पादन (GDP) च्या वाढीसाठी बुलेट ट्रेन (Bullet train) आवश्यक आहे. त्यासाठी जपान सरकारने अत्यल्प दराने कर्ज देऊ केले आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन रद्द करण्याचा विषयच येत नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज दिले. (Devendra Fadanvis defend bullet train project)

विधानपरिषदेत बुलेट ट्रेन व देशाचे आर्थिक सेवा केंद्र उभारण्याबाबत संजय दत्त यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना भारतीय आर्थिक सेवा केंद्र केंद्र शासनाने दुसरीकडे करण्याचे ठरवले असले, तरीही मुंबई शहरच त्यासाठी योग्य पर्याय आहे. त्यामुळे त्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करण्याचा सरकारचा विचार नाही, असे सांगितले.

ते म्हणाले, बुलेटट्रेनचा सहकार्य करारा २०१२ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीत झाला आहे. ते अत्यंत चांगले पाऊल आहे. यातून देशाच्या व राज्याच्या विकासाला चालना मिळेल. हा प्रकल्प जपानच्या पन्नास वर्षाच्या मुदतीच्या कर्जातून होईल. त्यात अर्धा टक्के व्याज असेल. पहिल्या वीस वर्षात काहीही परतफेड करायची नाही. त्यामुळे पुढच्या वीस वर्षांनी जे आर्थिक चित्र व जीडीपी असेल, त्याचा विचार करता हा प्रकल्प फायद्याचाच आहे.

या लक्षवेधी सुचनेवर बोलताना श्री. दत्त यांनी, उपनगरी रेल्वे वाहतूकीची स्थिती अत्यंत बिकट आहे. रोज सव्वा कोटी लोक त्यातून प्रवास करतात. वर्षभरात सहा हजाराहून अधिक प्रवाशांचा अपघातांत मृत्यू होतो. त्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत. मात्र बुलेट ट्रेनसाठी तहेतीस हजार कोटी उपलब्ध केस होतात, असा प्रश्न केला.

ते म्हणाले, बुलेट ट्रेनचा ३८८ किलोमीटरचा ६७ टक्के मार्ग गुजरातमध्ये तर १२० किलोमीटर हा ३३ टक्के मार्ग महाराष्ट्रात आहे. मात्र त्यासाठी गुजरात व महाराष्ट्र सरकार समसमान निधी देणार आहे, हे कसे?. बुलेट ट्रेनबाबत विविध सर्व्हेक्षण प्रसिद्ध झाले आहेत. त्यात तीच्या शंभर फेऱ्या झाल्या तरच ती आर्थिकदृष्ट्या परवडणारी होईल. तसे होणार नसल्याने हा प्रक्प राज्याच्या हिताचा नाही. यांसह असे विविध प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

राहुल नार्वेकर यांनी विविध देशांचे दाखले देत, बुलेट ट्रेन परवडत नसली तरी केली पाहिजे. त्यामुळे भविष्यात विकासाला चालना मिळेल. चीनमध्ये तेवीस हजार किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेनचा मार्ग आहे. चीनसह विविध देशांनी तसे केल्याने त्यांचा आर्थिक विकास झाला, असे सांगितले.

भाई जगताप यांनी या प्रकल्पातील विविध त्रुटी मांडल्या. कोणताही प्रकल्प करतना अंथरून पाहून पाय पसरले पाहिजेत. आज शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत. तसेच फडणवीस विमानतळ व बुलेट ट्रेनची चुकीची तुलना करून आपले म्हणने पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. दरवर्षी ६,७४२ प्रवासी उपनगरी रेल्वेतून पडून मृत्यू होतात. त्यांना द्यायला पैसे नाहीत. विकासकामांना पैसे नाही. जीडीपी सतत घसरत आहे. असे अनेक विरोधाभास असल्याने हा प्रकल्प रद्द करण्याचा विचार करावा, असे सांगितले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT