Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्याचं राजकारण तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले असून त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांनी सरकारला 11 तारखेपर्यंत सर्व मागण्या मान्य करण्याचा अल्टिमेटम दिला आहे.
काल गुरुवार (दि. 3) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री उदय सामंत आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने जरांगेंची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. मात्र सरकारच्या शिष्टमंडळाला यश आलं नाही. त्यामुळे मनोज जरांगे उपोषणावर कायम आहेत. यासर्व पार्श्वभूमीव आता ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, जात पडताळणी समिती ही महत्त्वाची समिती आहे. त्याच्यावर कुणीही दबाव आणता कामा नये. मंत्र्यांनी देखील दबाव आणू नये. काही प्रमाणपत्र जातपडताळणी समितीने नाकारली आहे. ती प्रमाणपत्र दुरूस्त करून देतो असं काही आमदार म्हणाले आहेत. त्यांना माझा सवाल आहे की, मुंबईत ४ नगरसेवकांचं जात पडताळणीत प्रमाणपत्र रद्द झालं आहे. त्यामुळे त्यांचं पद गेलं. ते देखील तुम्ही दुरूस्त करून देणार आहात का? असा सवाल भुजबळांनी उपस्थितीत करत नाव न घेता प्रसाद लाड यांना टोला लगावला.
सरकारला घरचा आहेर
मंत्री छगन भुजबळ यांनी कुणबी प्रमाणपत्र घेताना त्यावर खाडाखोडी केल्याचा आरोपही केला आहे. आता असे खाडाखोड केलेले दाखले तुम्ही स्वीकारणार आहात का? असा सवाल भुजबळांनी उपस्थितीत केला. जात पडताळणी समितीवर कुणीही दबाव आणू नये. राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी लक्षात घ्यावे ओबीसींनी निवडणुकीत तुम्हाला मदत केली आहे. तुमचं सरकार आणण्यात ओबीसींचा महत्त्वाचा हातभार आहे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी आपल्याच महायुती सरकारला घरचा आहेर दिला.
आता तुम्ही म्हणता मराठा कुणबी स्वतंत्र्य मंत्रालय सुरु करा. आता हे कसं काय होईल? मंत्रालय करायचं असेल तर सर्वच जातींसाठी करा. आमचा दाखल्याला विरोध नाही. मात्र, ओबीसी आरक्षण संपणार नाही हेही बघितलं पाहिजे. सरकारने स्पष्टता आणायला हवी. कधी OBC आरक्षण घेत आहे. कधी SEBC आरक्षण घेत आहेत, तर कधी EWS आरक्षण घेत आहेत. नक्की कुठलं आरक्षण तुम्हाला पाहिजे? एक विद्यार्थी तीन आरक्षणाचा कसा काय फायदा घेऊ शकतो? असा सवालही त्यांनी केला.
आमचे मंत्री सतत लाड पुरवण्यासाठी जात आहे, एक लाड गेले होते लाड पुरवायला असा टोलाही भुजबळांनी लगावला. समोरुन टिंगल केली जातेय, शिव्या दिल्या जाताय तरी मंत्री पाय धरायला जातात. दुसरीकडे कुणी एक शब्द जरी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोललं तरी त्याला पोलिस जाऊन पकडतात. इथे तर सगळं सर्रास सुरु आहे. महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्या पद्दतीने आपलं म्हणणं मांडा... उपोषण करा, मोर्चा करा...पण कुणाला काय बोलताय, कुणाला काय.. मी त्याचं उच्चारण आता करत नाही असं भुजबळ म्हणाले.
त्यांना 750 कोटी आणि OBC ला फक्त 5 कोटी
अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळला मदत दिली काही हरकत नाही. पण त्यांना 750 कोटी आणि OBC समाजाच्या समितीला केवळ 5 कोटी हे कसं काय चालेल? मी त्यामुळे त्या दिवशी समन्वय समितीच्या बैठकीतून उठून बाहेर आलो. अशा एक नाही अनेक गोष्टी असल्याचे भुजबळ म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.