Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळांनी जरांगेंना हिनवले, कावळ्याच्या शापाने...

Sampat Devgire

Bhujbal Vs Jarange: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगड येथे दसरा मेळावा घेतला. यावेळी प्रचंड जनसामुदाय उपस्थित होता. जरांगे यांनी या मेळाव्यात राज्य शासनाला इशारा दिला होता.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे विजयादशमीचा मेळावा आटपून आज येवल्याला भेट देत आहेत. यावेळी ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतराच्या घोषणेच्या स्मारकाला अभिवादन करतील. त्यांच्या समवेत मोठ्या संख्येने स्थानिक कार्यकर्ते आहेत.

राज्याचे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचा हा मतदारसंघ आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्या दौऱ्याविषयी प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा डीवचले आहे.

श्री भुजबळ म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांचे येवल्यात स्वागत आहे. या निमित्ताने ते ज्या स्मारकाला भेट देत आहेत, ते स्मारक मी तीस कोटी रुपये खर्च करून उभारले आहे. त्यामुळे ते या स्मारकाला भेट देतील, यावेळी त्यांना तिथे फुले, शाहू, आंबेडकरांचे विचारही दिसतील.

मनोज जरांगे पाटील यांनी दसऱ्याच्या मेळाव्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य शासनावर टीका केली होती. राज्य शासन मराठा समाजाची फसवणूक करीत आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहोत.

राज्य शासनाने आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा हे सरकार उलथून टाकू असा इशारा त्यांनी दिला होता. यावर श्री भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना उत्तर दिले.

मंत्री भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना हिणवले. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, या एका वाक्यात त्यांनी रांगे यांचा समाचार घेतला. यानिमित्ताने भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर टिका करण्याची संधी सोडली नाही.

बीड येथे झालेल्या मेळाव्यात जरांगे पाटील यांच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा तलवार असलेला बॅनर होता. त्यावर महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे होते. त्याला आक्षेप घेत जरांगे पाटील यांनी तलवारीवर पुतळे कसे ठेवले? असा आक्षेप घेतला. ते काढून टाकले. याबाबत देखील भुजबळ यांनी टीका केली आहे.

यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले, मी जातीयवाद करत नाही. मराठा समाजाचा द्वेष देखील करीत नाही. तसे असते तर विधिमंडळात तीन वेळा मराठा आरक्षणाचा प्रस्ताव आला होता. तो मंजूर झाला. त्याला मी पाठिंबा दिला आहे, हे विसरू नका. मी द्वेष करत असतो तर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला नसता, असा दावा त्यांनी केला.

माझ्या मतदारसंघात सर्व समाजाच्या आणि मतदारांच्या विकासासाठी मी काम करतो. मी केलेली विकासकामे सर्वांसाठी आहेत. माझ्या कार्यकर्त्यांमध्ये ५० टक्के कार्यकर्ते मराठा समाजाचे आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT