Rahul Dhikle, Seema Hiray & Devyani Pharande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics: धास्तावलेल्या भाजपने उडवली आमदारांची झोप, `हे` आहे कारण!

Sampat Devgire

Nashik BJP News: विधानसभा निवडणुकीबाबत भाजप अतिशय सावध पावले टाकत आहे, याची प्रचिती काल आली. लोकसभा निवडणुकीचा मोठा धसका या पक्षाने घेतला आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच आत्मविश्वास निर्माण करण्याचे मोठे आव्हान पक्षापुढे आहे.

नाशिक शहरात भाजपचे देवयानी फरांदे (मध्य), राहुल ढिकले (पूर्व) आणि सीमा हिरे (पश्चिम) असे तीन विद्यमान आमदार आहेत. या तिन्ही मतदारसंघांचा आढावा मंगळवारी घेण्यात आला. यावेळी आमदार फरांदे प्रकृती बरी नसल्याने उपस्थित नव्हत्या. त्यासाठी अनुक्रमे चित्रा वाघ, खासदार स्मिता वाघ आणि नंदू महाजन हे तीन निरीक्षक आले होते.

या निरीक्षकांनी दुपारनंतर प्रदीर्घकाळ बैठक घेतली. रात्री आठला अचानक निरीक्षकांनी तीन नावे सुचविण्यासाठी मतदान घेण्याचे जाहीर केले. वस्तुतः हे आधीच ठरले होते. भारतीय जनता पक्षाचे शहरातील माजी नगरसेवक, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे मतदान अपेक्षित होते.

या मतदानासाठी भाजपचे १,२८० जण मतदानासाठी पात्र होते. अचानक झालेल्या या निर्णयाने पदाधिकारी सावध झाले. इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या, तर काही आमदार अस्वस्थ झाले. ६२३ जणांनी या मतदान प्रक्रियेत भाग घेतला. यामध्ये कोणतेही नाव देण्यात आले नव्हते.

नावे सुचविताना संपर्कात राहणारे, कार्यकर्त्यांना मदत करणारे, पक्षासाठी उपयुक्तता असलेले, जनमानसात चर्चेत असलेले आणि जनमानसात स्थान असलेले असे निकष होते. प्रत्येकाने चिठ्ठीवर भाजपच्या तीन नावे सुचविण्याच्या सूचना होत्या. त्याप्रमाणे रात्री उशिरापर्यंत हे मतदान झाले. त्याचा निष्कर्ष समजू शकला नाही.

मतदारांचा निर्णय झाल्यावर काही आमदारांमध्ये अक्षरशः पळापळ झाली. काहींनी आपले नाव सुचवावे यासाठी प्रयत्न केले. भाजपमध्ये असे पहिल्यांदाच होत होते. यानिमित्ताने पक्षामध्ये कार्यकर्त्यांना स्थान आहे. त्यांच्या विचाराला महत्त्व दिले जाते. असा संदेश देण्याचा प्रयत्न वरिष्ठांकडून करण्यात आला.

गेले काही दिवस एककल्ली आणि वाटेल तसे निर्णय घेणाऱ्या या पक्षात सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव निर्माण झालेला आहे. त्यांना कोणीच किंमत देत नाही. बाहेरून आलेल्यांना मानसन्मान मिळतो. अशी भावना निर्माण झाली आहे. हे अजिबात लपून राहिलेले नाही.

पक्षाला देखील याची जाणीव झाली आहे. त्यामुळे पक्षाचे वरीष्ठ नेते सावध झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिक दौऱ्यावर आले असता, त्यांनी ही बाब स्पष्टपणे बोलून दाखविली. त्याचा हा परिणाम असावा. एकंदरीतच लोकसभा निवडणुकीच्या झटक्याने भाजप आता ताकही फुंकून पीत आहे, असे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपला सिंगल डिजिट वर आणून ठेवले. त्याचा हा परिणाम असावा. भारतीय जनता पक्षात सुरू झालेले हे नवे वारे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखण्याच्या हालचाली आहेत.

त्या किती उपयुक्त ठरतील, हा वादाचा विषय असू शकेल. मात्र भाजप हा नवीन काहीतरी प्रयत्न करतो असा संदेश यातून मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रोखा, असा संदेश पदाधिकाऱ्यांना दिला होता. उद्धव ठाकरे यांच्या बाबत देखील ते हेच म्हणाले.

विरोधी पक्षांचे कार्यकर्ते फोडा असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. या सगळ्यांचा परिणाम म्हणून भाजप आता सावध झाला आहे. याची जाणीव त्या पक्षातील कार्यकर्त्यांनाही झाली. पक्षाने काल शहरातील तिन्ही मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचे मतदान घेतले. हा त्याचाच परिपाक म्हणता येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT