Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat: कॅबिनेट मंत्रिपद मिळत असताना थोरात का झाले होते राज्यमंत्री ? स्वतःच सांगितला किस्सा

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News: राजकीय नेत्यात शहरी भागातील नेत्यांसाठी नागरी सुविधांचा विकास तर ग्रामीण भागातील नेत्यांसाठी शेतीसाठी जलसिंचन हा सर्वात मोठा राजकीय विषय असतो. त्याच अनुषंगाने ग्रामीण भागातील नेते पाटपाण्याच्या सुविधा आपल्या नागरिकांना किती जास्तीत जास्त देता येतील यावर नेहमीच भर ठेवतात.

नगर जिल्ह्याचा विचार करता नगर उत्तरेमध्ये भंडारदरा आणि मुळा धरणामुळे हा संपूर्ण सात-आठ तालुक्यांचा परिसर सुजलाम सुफलाम झालेला आहे. मात्र, यामागे या सर्वच तालुक्यातील नेत्यांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे म्हणावे लागतील. असाच प्रयत्न आपण केला आणि त्यासाठी चक्क कॅबिनेट मंत्रीपद न स्वीकारता पाठ पाण्याचा विषय मार्गी लागेल, या हेतूने राज्यमंत्री पद स्वीकारलं, असा मोठा खुलासा आमदार बाळासाहेब थोरात यांनी एका कार्यक्रमात केला.

कॅबिनेट मंत्रीपदाची संधी असतानाही फक्त निळवंडे धरण पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे राज्यमंत्री पद मागून घेतले. त्यानंतर सातत्याने कामाला गती देऊन धरण व बोगद्यांसह कालव्यांची कामे पूर्ण केली. अगदी कोरोना काळातही कालव्यांची कामे सुरू केली अनेक वर्ष केलेल्या कामातून निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागातील शेतात आले हा आनंदाचा क्षण असल्याची भावना, बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोहारे मिरपुर येथे डाव्या कालव्याचे पाणी पूजन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी थोरात म्हणाले की, "चिंचोली गुरव येथे निळवंडे धरणासाठी ऐतिहासिक पाणी परिषद झाली. निळवंडे धरण हे या भागातील दुष्काळी जनतेसाठी आहे. अनेक वर्ष काम केल्यानंतर आज दुष्काळी भागात पाणी आले आहे. हा शेतकऱ्यांच्या व आपल्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे. पिढ्यान पिढ्यांनी या पाण्याची वाट पाहिली आहे.आता यापुढे कायमच पाणी येणार आहे".

अकोले-संगमनेरचा निळवंडेसाठी मोठा त्याग

"अनेक वर्षाचे कष्ट म्हणून पाणी आले. यामध्ये अनेकांनी योगदान दिले. पुनर्वासित शेतकरी, अकोले तालुक्यातील शेतकरी यांचेही मोठे सहकार्य लाभले. कृती समितीने कालव्यांच्या मागणीसाठी मार खाल्ला. अनेक कष्टातून हे मोठे काम उभे राहिले आहे.

काम कोणी केले हे जनतेला माहिती आहे. संगमनेर-अकोले व्यतिरिक्त कोणीही या धरणग्रस्तांना जमीन दिली नाही. आपण कधीही जनतेमध्ये दुजाभाव करत नाही. पाणी आले पण या कामासाठी ज्यांनी कष्ट केले तो इतिहास विसरून चालणार नाही", असेही ते म्हणाले.

'आडकाठ्या आणणारे आज श्रेय घेतायेत'

"निळवंडे धरण व कालवे हे फक्त आमदार बाळासाहेब थोरात यांनीच केले असून ज्यांचे निळवंडे कामांमध्ये काही योगदान नाही ते आज श्रेय घेऊ पाहत आहेत. त्यांनीच या कामांना आडकठ्या निर्माण केल्या आणि सत्तेत आल्यामुळे आज तेच श्रेय घेण्यासाठी धडपड करत आहेत", असे उत्तमराव घोरपडे यांनी सांगत विखे यांचे नाव न घेता निशाणा साधला.

(Edited By - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT