Deep Chavan Congress Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar Congress : काँग्रेसकडून जबाबदारी मिळताच दीप चव्हाण "ॲक्टिव्ह"; 400 कोटीच्या योजनेवरून 'हल्लाबोल'

Deep Chavan Demands Action on Delayed Amrut and Phase 2 Water Scheme in Ahilyanagar : अहिल्यानगर शहरासाठी रेंगाळलेल्या अमृत पाणी आणि फेज-2पाणीपुरवठा योजनेवरून काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी निशाणा साधला.

Pradeep Pendhare

Ahilyanagar water supply issue : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जुलैपासून राज्यात नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या. यात अहिल्यानगर शहराचे रिक्त असलेल्या शहर जिल्हाध्यक्ष पदावर काँग्रेसचे जुने कार्यकर्ते तथा माजी महापौर दीप चव्हाण यांना संधी दिली. पदाची जबाबदारी मिळताच, दीप चव्हाण "ॲक्टिव्ह" मोडवर आले आहेत.

अहिल्यानगर शहराची रखडलेली सुमारे 400 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करूनही अमृत पाणी योजना व फेज-2 पाणीपुरवठा योजनेवरून, महापालिका प्रशासनावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. योजनेवर काम करणारे महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांवर थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी दीप चव्हाण यांनी केली आहे.

काँग्रेसचे (Congress) दीप चव्हाण म्हणाले, "अहिल्यानगर शहराची ही पाणीपुरवठा योजना गेल्या १५ वर्षांपासून अपूर्ण राहिली आहे. अहिल्यानगर महापालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर कारवाईसाठी काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव म्हणजे निव्वळ धुळफेक आहे. जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे". त्यामुळे ठेकेदार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी दीप चव्हाण यांनी केली.

'या योजनेत भ्रष्टाचार (Corruption), अंमलबजावणीत ढिसाळपणा, निधीचा दुरुपयोग आणि जबाबदारीपासून पळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिका स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे केवळ सर्व संबंधितांवर जबाबदारीही निश्चित होणे गरजेचे आहे. टक्केवारी खाणाऱ्यांना देखील यात आरोपी झाले पाहिजे', अशी मागणी दीप चव्हाण यांनी केली.

'ही योजना अपूर्ण असतानाही 90 टक्के निधी प्रशासकीय कार्यकाळात अदा करण्यात आला. रहिवाशांकडून नळ जोडसाठी परस्पर पाच हजार रुपये देखील घेण्यात आले. हे पैसे महापालिकेत जमा न करता ठेकेदाराला परस्पर देण्यात आले. आयुक्तांनी एकाधिकारशाही वापरून पाणीपट्टीला विरोध असतानाही 900 रुपयांचा भुर्दंड नागरिकांवर लादला. त्यामुळे पाणीपट्टीची वाद देखील बेकायदेशीर ठरते', असा घणाघात दीप चव्हाण यांनी केला.

योजनेचे काम असलेल्या तापणी प्रोस्टेट प्रा. लिमिटेड आणि पार्वती अ‍ॅग्रोटेक इंडिया कंपन्यांनी योजनेचे काम अर्धवट सोडून दिले आहे. परंतु योजनेच्या कामासाठी दोन्ही कंपन्यांनी कोट्यवधीचा निधी घेतला आहे. प्रशासनाने देखील ही कामे करून न घेता, आता अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत असल्याकडे दीप चव्हाण यांनी लक्ष वेधले.

योजनेवर काम करणारी कंपनी, तिचे ठेकेदार, सल्लागर कंपनीचे कार्यकारी अभियंता, प्रशासकीय अधिकारी, कंत्राट मजुरी समितीचे सदस्य, लेखा व देयक प्रक्रिया करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी दीप चव्हाण यांनी केली. दीप चव्हाण यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अहिल्यानगर महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT