Sharad Pawar and Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Onion Issue: कांद्याच्या प्रश्नात दोन्ही पवारांची उडी; अजितदादांची बैठक तर शरद पवारांची 'ही' मागणी

Ganesh Thombare

Nashik News: राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात राजकीय रस्सीखेच सुरु झालेली असतानाच आता कांद्याच्या प्रश्नातही दोघांनीही उडी घेतली आहे. शरद पवारांनी कांद्याची निर्यात शुल्क हटवण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यापाऱ्यांबरोबर बैठक घेवून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत कांद्याच्या प्रश्नासंदर्भात पुन्हा बैठक पार पडणार आहे. कांद्याचे दर वाढताच केंद्र सरकारने निर्यात शुल्क ४० टक्के वाढवले. त्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. पण हे आंदोलन संपत नाही तोच व्यापाऱ्यांनी लिलाव बंद आंदोलन पुकारले.

हा प्रश्न सोडवण्यासाठी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री अब्दुल सत्तार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, नितीन पवार यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी व्यापाऱ्यांसोबत बैठक घेत चर्चा केली. या बैठकीत योग्य तोडगा न निघाल्याने आज रात्री पुन्हा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.

अजित पवारांचे हे प्रयत्न सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कांद्याच्या प्रश्नात लक्ष घातले आहे. मंगळवारी दुपारी मुंबईत पत्रकार परिषद घेत कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याची मागणी केली.

"केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क वाढवल्यामुळे कांद्याबाबत अशी परिस्थिती ओढावली. शेतकरी अडचणीत सापडला असून त्यातच कांदा व्यापाऱ्यांनी संप पुकारल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. कांदा व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ भेटीसाठी आले होते. व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली. एकूणच कांदा प्रश्न महत्वाचा असून आजच्या बैठकीतून हा निर्णय सोडवावा", अशी विनंती शरद पवारांनी सरकारला केली.

दरम्यान, कांद्याच्या प्रश्नासंदर्भात शरद पवार नेहमी लक्ष घालत आले आहेत. अनेकदा त्यांनी हा प्रश्नही सोडवला. आता अजित पवारांना हा प्रश्न सोडवण्यात यश मिळेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अजित पवार काय म्हणाले ?

कांदा उत्पादक शेतकरी, कांदा खरेदी व्यापारी आणि ग्राहक या सर्वांच्या हिताचाच सरकार विचार करेल. देशातील इतर राज्यांच्या बाजारांमध्ये 'नाफेड'मार्फत कमी दरात कांदा विक्री होत असल्यामुळे राज्यातील कांदा व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT