Devidas Pingle with Farmers at APMC
Devidas Pingle with Farmers at APMC Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

देविदास पिंगळेंनी शेतकऱ्यांचे थकलेले २५ लाख रुपये मिळवून दिले!

Sampat Devgire

नाशिक : नाशिक (Nashik) कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (APMC) एका आडतदाराने टोमॅटोच्या मालापोटी अनेक शेतकऱ्यांच्या (Farmers) रक्कमा थकविल्या होत्या. शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवरून बाजार समिती प्रशासन संबंधित आडत्याच्या गाळ्याचा लिलाव व बँक गॅरंटी मोडून शेतकऱ्यांचे सुमारे २५ लाख रुपये तीन दिवसांत परत देणार आहेत.

सोमवारी काही शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे मिळाल्याने शेतकऱ्यांनी सभापती देवीदास पिंगळे व संचालक मंडळासह सचिव व बाजार समिती प्रशासनाचे आभार मानले. सभापती देवीदास पिंगळे, संचालक दिलीप थेटे व सचिव अरुण काळे उपस्थित होते.

पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डमध्ये टोमॅटो व्यापार करणारे जलाराम ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर ठक्कर याला दिंडोरी रोडवरील मुख्य मार्केट यार्ड गाळा क्रमांक १२ हा ९९ वर्षांच्या कालावधीसाठी दिला होता. मध्यंतरी आडत्याने बाजार समितीचे लायसन्स घेऊन टोमॅटो खरेदी-विक्रीचा व्यवसाय केला. या आडत्याने जिल्हाभरातील अनेक शेतकऱ्यांकडून टोमॅटो घेतला आणि त्याची विक्रीची रक्कम थकविली. याबाबत अनेकदा मागणी करूनही शेतकऱ्यांना थकीत रक्कम मिळत नव्हती. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रारी केल्या.

कोरोनाकाळात शेतकऱ्यांना कष्टाचे पैसे मिळत नसल्याचे पाहून सभापती देवीदास पिंगळे यांनी शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्रीची रक्कम परत करण्यासाठी पुढाकार घेतला. संबंधित गाळ्याचा २४ जानेवारीला जाहीर लिलाव ठेवला होता. शेतकऱ्यांना तसे कळविले होते. पैसे बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आवश्यक दस्तऐवजांसह बाजार नियमन विभागात तक्रारी केल्या. त्या तक्रारींची शहानिशा करून बाजार समितीने गाळ्याचा लिलावापोटी व बँक गॅरंटी मोडून जमा झालेली जवळपास २५ लाख रुपयांची रकम शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे देण्यात येणार आहे.

कष्टाने पिकविलेल्या शेतमालाची आडत्याने थकविलेली रकम परत मिळेल, अशी अपेक्षा नसताना बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे यांच्या पुढाकाराने रकम परत मिळाल्याने संबंधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करीत सभापती देवीदास पिंगळे, संचालक मंडळ, सचिव आणि बाजार समिती प्रशासनाचे आभार मानले.

नाशिक बाजार समिती शेतकऱ्यांची असून, शेतकरी आणि आडते यांच्यातील दुवा म्हणून समिती काम करते. त्यामुळे शेतकरी बाजार समितीचा मुख्य घटक आहे. यापुढे आडत्याने शेतकऱ्यांचे पैसे थकविल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या, तर आडत्याचा गाळा सील करून त्याचा लिलाव केला जाईल. बाजार समितीचे आडत्यांवर नियंत्रण असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी न डगमगता निःसंकोचपणे आपला शेतमाल बाजार समितीतच आणावा, असे सभापती, माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी सांगितले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT