Sarpanch Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lasalgaon Sarpanch Election: ...थेट मंत्र्यांचा इंटरेस्ट अन् ट्विस्टवर ट्विस्ट ; आता थेट निवडणुकीलाच स्थगिती !

Sampat Devgire

High Court stay on Election: आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असा नावलौकिक असलेल्या लासलगाव सरपंचाच्या निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी होत आहेत. थेट मंत्र्यांनीच रस घेतलेल्या या निवडणुकीला आज उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

लासलगाव सरपंच पदाची निवडणूक यंदा सत्ताधारी आणि विरोधी गटांनी अतिशय प्रतिष्ठेची केल्याने मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी आणि सदस्य फोडण्याच्या घटना घडत आहेत. सत्ताधारी गटाचे सरपंच जयदत्त होळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर काल नव्या सरपंचाची निवड होणार होती. मात्र, विरोधकांनी सत्ताधारी गटातील तीन सदस्यांना फोडले. त्यामुळे ही निवडणूक अतिशय रंजक झाली होती. त्याला एका मंत्र्यांच्या माध्यमातून सत्ताधारी गटाने स्थगिती मिळवली. विरोधकांनी अन्य मंत्र्यांच्या माध्यमातून अवघ्या तासाभरात ही स्थगिती उठवली. मात्र, पुरेसा कालावधी शिल्लक नसल्याने ही निवडणूक शुक्रवारी होणार होती.

जयदत्त होळकर आणि नानासाहेब पाटील या गटाच्या अंतर्गत निर्णयानुसार होळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर नानासाहेब पाटील सरपंच होणार होते. या गटाचे तीन सदस्य काल विरोधकांना मिळाले होते. यातील अफजल शेख आणि रोहित पाटील यांनी रात्रीतून आपली भूमिका बदलत आज ते पुन्हा सत्ताधारी गटात आले होते. त्यामुळे होळकर आणि पाटील गटाकडे नऊ तर विरोधकांकडे आठ असे संख्याबळ झाले होते. त्यामुळे या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

शुक्रवारी सकाळी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असता, सरपंच पदासाठी अमोल थोरे, अफजल शेख, सायली पाटील, चंद्रशेखर होळकर आणि योगिता पाटील या पाच उमेदवारांनी सहा अर्ज दाखल केले होते. ही प्रक्रिया सुरू असतानाच मावळते सरपंच जयदत्त होळकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी नुसार निवडणुकीला स्थगिती मिळाली. त्यामुळे आता सरपंच आणि उपसरपंच पदाचे राजकारण अनिश्चित झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मतदारसंघातील ही निवडणूक असल्याने त्यात त्यांचे समर्थक आणि विरोधक अशी विभागणी झाली होती. त्यामुळे भुजबळ यांनी देखील पडद्यामागून त्यात रस घेतल्याचे बोलले जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिल्यावर विरोधी गटाने मंत्र्यामार्फत स्थगिती उठवली होती. या सर्व वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जयदत्त होळकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. जी. एस. पटेल आणि कमल कथा यांच्या खंडपीठापुढे त्याची सुनावणी होऊन सरपंच पदाच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली.

कांद्याचे बाजारपेठ म्हणून ओळखली जाणाऱ्या लासलगाव सरपंच पदाला मोठी राजकीय प्रतिष्ठा आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी सदस्यांना देखील मोठा भाव असतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर राजकारण घडल्याचे यंदाच्या निवडणुकीत दिसले.

(Edited by sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT