Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse Politics: खडसेंनी वाढवला सस्पेन्स, भाजपच्या केंद्रीय नेत्यांबाबत म्हणाले...

Sampat Devgire

Devendra Fadnavis News: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा अद्यापही सुरूच आहे. त्याबाबत विविध कयास बांधले जात आहेत. आता यासंदर्भात श्री खडसे यांनी आणखी सस्पेन्स वाढवला आहे.

श्री खडसे यांना केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी प्रवेश दिला होता. त्याची अंतिम घोषणा राज्यातील नेतृत्व करणार होते. लोकसभा निवडणुकीत श्री खडसे यांनी पक्षाचा प्रचारही केला. मात्र आता या प्रवेशाबाबत अनिश्चितता आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसे यांनी ही माहिती दिली.

राज्यातील दोन नेत्यांचा खडसे यांच्या भाजप प्रवेशाला विरोध आहे. हे नेते कोण? त्याबाबत खडसे यांनी मौन बाळगले. हे नेते कोण सर्वश्रुत आहे. केंद्रीय नेत्यांनी याबाबत काय सांगितले? याचा खुलासा योग्य वेळी करीन, असे सांगून खडसे यांनी या विषयावरील सस्पेन्स आणखी वाढवला आहे.

यासंदर्भात बोलताना श्री खडसे यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत काय घडले? याची माहिती सांगितली. ते म्हणाले, मी भारतीय जनता पक्षात जाण्यास स्वतःहून इच्छुक नव्हतो. मात्र दिल्लीतील काही वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनीच याबाबत मला दूरध्वनी केला होता.

दिल्लीतील वरिष्ठ भाजप नेत्यांच्या सांगण्यानुसार माझा प्रवेश झाला. नंतर मात्र काय माशी शिंकली हे कळत नाही. राज्यातील दोन नेत्यांनी त्याला विरोध केला की काय? हे सर्वांना माहीत आहे. त्यांची नावे घेण्याची गरज नाही.

आता दिल्लीतील ज्येष्ठ नेते याबाबत काहीच बोलत नाहीत. त्यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. मात्र प्रवेशाचा प्रश्न पुढे सरकला नाही. त्यांनी मला काय सांगितले? हे मी योग्य वेळी सांगेन, असे विधान करून खडसे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबाबत सस्पेन्स वाढवला आहे.

श्री खडसे यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. मात्र त्यांचा रोख प्रामुख्याने राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर होता.

माझे राजकीय करियर उध्वस्त केले, असा आरोप त्यांनी या नेत्यांवर नाव न घेता केला. ते म्हणाले, माझ्या नेतृत्वाखाली राज्यात २०१४ मध्ये निवडणुक लढविण्यात आली. भाजपची सत्ता आली. मात्र सत्ता येताच मला टार्गेट करण्यात आले. २०१६ मध्ये मला मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. तसे काहीही कारण नव्हते.

माझ्या विरोधात खोट्या केसेस करण्यात आल्या. खुन्नसपणे वागले. दहशत निर्माण केली. मला एकटे पाडले. त्यांचे शत्रुत्व माझ्याशी होते. मात्र माझ्या पत्नी आणि अमेरिकेत उच्च पदावर नोकरी करणाऱ्या जावयालाही त्रास दिला.

माझ्या जावयाला नोकरी सोडून यावे लागले. त्यांना जेलमध्ये डांबले. एव्हढे शत्रुत्व माझ्याशी केले. निरपराध लोकांवर त्यांनी सत्तेचा गैरवापर करून खोट्या कारवाया केल्या. हिंमत असेल तर त्यांनी (उपमुख्यमंत्री फडणवीस) एखादे चांगले काम करून दाखवावे.

राज्यात महिलांवर एवढे अत्याचार होत आहेत. ते रोखा. पुण्यात कोयता गँगची दहशत आहे. नगरमध्ये कोयता गॅंग आहे. त्यांच्यावर कारवाई करून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले.

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या उभारणीसाठी मी गेली ४२ वर्ष कष्ट घेतले आहे. अगदी सायकलवर देखील प्रवास केला. बहुजन समाजात या पक्षाला रुजविण्यासाठी परिश्रम घेतले, याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

राज्यातील भाजप नेत्यांच्या या कर्तृत्वामुळे पक्षाची मोठी पिछेहाट झाली. २०१४ मध्ये पक्षाचे १२३ आमदार होते. २०१९ मध्ये ते १०५ झाले. आगामी निवडणुकीत किती आमदार कमी होतील, सांगता येत नाही. कदाचित ६०-६५ पर्यंत खाली येतील, असे देखील बोलले जाते.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT