Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Election News: ग्रामपंचायतींसाठी पुन्हा धुरळा; 69 सार्वत्रिक, तर 97 ठिकाणी होणार पोट निवडणूक

Pradeep Pendhare

Grampanchayat Election : अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकींचा धुरळा उडणार आहे. जानेवारी ते जून महिन्यात नगर जिल्ह्यातील एकूण 69 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत आहे. याशिवाय 97 ग्रामपंचायतींमध्ये सदस्यपदांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील 94 ग्राम पंचायतींचा कार्यकाळ पूर्ण होत असून, तेथील प्रभाग रचना, आरक्षण, मतदार यादी अद्ययावत करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाच्या ग्रामपंचायत शाखेने केली आहे. यापैकी जानेवारी ते जून या सहा महिन्यांमध्ये कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या एकूण 69 ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Grampanchayat Election) पहिल्या टप्प्यात पार पडणार आहेत. यामध्ये नेवासा तालुक्यातील 25,कर्जत तालुक्यातील 18, पाथर्डी तालुक्यातील 4, शेवगाव तालुक्यातील 6, अकोले, श्रीरामपूर, श्रीगोंदे आणि राहुरी तालुक्यातील प्रत्येकी 2 ग्रामपंचायती, तसेच नगर, पारनेर, संगमनेर तालुक्यातील प्रत्येकी एक, तर कोपरगाव, जामखेडमधील प्रत्येकी तीन ग्राम पंचायतींचा समावेश आहे. शुक्रवारी या ग्रामपंचायतींच्या मतदार यादी (Voting list) जाहीर केल्या जाणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील 97 ग्राम पंचायतींमधील 147 जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. ग्राम पंचायत सदस्यांचा मृत्यू, नियमांचे उल्लंघन केल्याने अपात्र झालेले सदस्य आणि काही कारणांमुळे राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागांवर ही निवडणूक होणार आहे. दरम्यान, ग्राम पंचायतीच्या निवडणुका जाहीर होत असल्याने जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. तसेच गावातील राजकीय नेत्यांनी देखील पॅनलच्या अनुषंगाने चाचपणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांनी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर भर दिला आहे. तसेच धार्मिक स्थळांच्या सहलीचे आयोजन केले जात आहे.

राज्याच्या राजकारणात पक्ष फुटीनंतर दोन मुख्य राजकीय गटांचा समावेश झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीपूर्वीच या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष अथवा गटाकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर आपला पॅनल निवडून येण्यासाठी जोर लावला जाणार आहे. राज्याचे राजकारण ढवळून निघाल्यानंतर नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत कोणत्या पक्षाचे अथवा गटाचे वर्चस्व अधिक राहणार आहे, याचे चित्र आगामी काळात पाहायला मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT