Dada bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse News : दादा भुसेंच्या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी फिरवली पाठ!

Sampat Devgire

Nashik Trible Farmers news : पालकमंत्री दादा भुसे आणि उशिरा हे समीकरणच झाले आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या रानभाजी महोत्सवाला भुसे तब्बल चार तास उशीरा आले. शेवटी ताटकळलेले शेतकरी भुसे यांची वाट न पाहताच घरााकडे परतले. त्यामुळे पालकमंत्र्यांना मोजक्या शासकीय कर्मचाऱ्यांपुढे भाषण करीत कार्यक्रम उरकावा लागला. (Guardian Minister came four hours late as usual for trible farmers programme)

नाशिकचे (Nashik) पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या हस्ते आदिवासींच्या (Trible) रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन होणार होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) (NCP) गटाचे नरहरी झिरवाळ उपस्थित होते.

काल झालेल्या रानभाजी महोत्सवाला वेगळी पार्श्र्वभूमी देखील आहे. यापूर्वी १ जुलैला कृषीदिनाचा कार्यक्रम झाला होता. जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र पालकमंत्र्यांसह कोणीही लोकप्रतिनिधी त्याकडे फिरकले नाही. शेतकऱ्यांच्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधींनी दांडी मारली असे अपवादानेच घडले होते. तो कार्यक्रम शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

कदाचित कृषीदिनाच्या कार्यक्रमाचा वचपा म्हणून तर शेतकऱ्यांनी दादा भुसे यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली की काय? अशी चर्चा सुरू होती. दुपारी दोनला पालकमंत्री दादा भुसे उपस्थित राहणार होते. मात्र ते जवळपास चार तास उशिराने आल्याने ताटकळलेले शेतकरी त्यांची वाट न पाहताच घरी जाणे पसंत केले.

पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते दोनदिवसीय रानभाज्या महोत्सवाचे उदघाटन झाले, यावेळी मोजके शासकीय कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी देखील पालकमंत्र्यांना पुढच्या कार्यक्रमाला जायचे असल्याचे कारण देत भाषण आटोपते घेतले. भुसे यांनी शासकीय कर्मचाऱ्यांपुढे भाषण करावे लागले. रानभाज्या विक्रीत सातत्य असायला हवे. त्यासाठी जिल्हाधिकारी व कृषी कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

श्री. झिरवाळ म्हणाले, की रानभाज्यांच्या बारमाही विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. आदिवासी बांधव त्यात सातत्य ठेवतील. त्यामुळे आदिवासी भागातील व्यक्तींचे विक्री कौशल्य विकसित करण्याची आवश्यकता आहे.

प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यातर्फे संभाजी चौक, उंटवाडी येथे झालेल्या रानभाज्या महोत्सवात जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, ‘रामेती’चे प्राचार्य शिवाजी आमले आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT