Farmers Association sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Milk Price Hike Farmers Agitation : एकनाथ शिंदे सरकारचं सर्वच काढलं; मंत्री विखेंच्या कारभारावर शेतकरी नाराज अन् आता...

Pradeep Pendhare

Ahmednagar Farmers Association : दुधाच्या दरावरून शेतकरी संघटना आणि दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाली आहे. ठाकरे सरकराच्या काळातील दुधाच्या दराची आठवण करून देत शिंदे सरकारला शेतकरी संघटनेने धारेवर धरण्यास सुरवात केली आहे. राधाकृष्ण विखे यांनी दुग्धविकास मंत्री पदाभार स्वीकारल्यापासून दुधाचे दर नीचांकी पातळीवर आलेत. सरकारच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत शेतकरी संघटनेने श्रीरामपूर येथील तहसीलदारांना निवेदन देत सरकारला आंदोलनाचा सज्जड इशारा दिला आहे.

राज्य सरकारने दूध दराबाबत (Milk Price) तत्काळ लक्ष घालावे अशी मागणी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन देऊन सरकारकडे केली आहे. सरकारन दूध दराबाबत दुर्लक्ष महागात पडेल, असा इशारा दिला आहे. सरकारने दूध दराबाबत निर्णय न घेतल्या 25 जूनपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. श्रीरामपूरमधील तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर शेकडो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. यामुळे दूध उत्पादकांनी आंदोलनाची तयारी केल्याचे दिसते.

राज्यात शिंदे सरकार येण्यापूर्वी ठाकरे सरकारच्या काळात दुधाला 36 ते 40 रुपये दर होता. शिंदे सरकार आल्यानंतर आणि राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी पदभार घेतल्यानंतर दुधाचे दर 20 ते 24 रुपये इतक्या नीचांकी पातळीवर आले. हा दर 2011-12 मध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळत होता. बारा वर्षानंतरही शेतकऱ्यांच्या दूध दरात वाढ न होता 15 ते 18 रुपयांनी दूध दर कमी झाले आहेत. राज्यात दुधाचे दर पडल्यामुळे शेतकरी किती कमवतो, याचा अंदाज सरकारने घेतला पाहिजे. यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेने केला.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना खोट्या अनुदानाची बोळवण न करता आणि दिशाभूल न करता 38 ते 40 रुपये दर असताना त्यामध्ये भाव पाडले. यामुळे 15 ते 18 रुपये प्रति लिटर तफावत निर्माण झाली. त्या फरकासह किमान 40 रुपये प्रति लिटर दुधाला दर द्यावा अथवा 55 रुपये प्रति लिटर गायीच्या दुधाला भाव देण्यात यावा.

राज्यात एक वर्षापासून शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या दुधाचे दर पंधरा ते अठरा रुपयांनी कमी झाले. मात्र सरकारची मान्यता असलेल्या चिलिंग प्लांटच्या पॅकिंग दुधाचे दर आहे तेच आहेत. त्यामुळे या मधल्या 15 ते 18 रुपये प्रति लिटरच्या फरकाची रक्कम कुठे गेली? असा सवाल दूध उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी 30 टक्के राज्यात भेसळयुक्त दूध असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे शहरी ग्राहकांकडून पॅकिंग दूध वापरण्यास नापसंती दर्शवली जात आहे. याचाही फटका दूध उत्पादकांना बसला आहे. भेसळयुक्त दुधाचा व पडलेल्या दाराचा नेमका मलिदा कोण खात आहे, असाही प्रश्न शेतकरी संघटनेने केला आहे. दुधाचे दर कमी झाल्यानंतर खाद्याचे व जनावरांच्या औषधांचे, चाऱ्याचे भाव कमी न होता त्यामध्ये वाढच दिसत आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर असेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT