Ajit Kala, Rahata taluka  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ganesh Sugar Factory Election : शेतकरी संघटना कोणाचं हत्यार होणार नाही ; विखे- थोरात- कोल्हें पॅनलच्या विरोधात लढण्याचा निर्धार !

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. शेतकरी संघटनेच्या पॅनलचा प्रचाराचा नारळ काल गुरुवारी (8 जुन)ला वाकडी इथे खंडोबा मंदिरात फुटला.

कारखान्याच्या निवडणुक प्रचाराची रणधुमाळी आता सुरु झाली आहे. प्रत्येक पॅनलचे प्रमुख विरोधी पॅनलच्या नेत्यांवर शाब्दिक प्रहार करताना दिसून येत आहेत. या निवडणूकीत उतरलेले महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार स्नेहलता कोल्हे ही सर्व दिग्गज राजकीय मंडळी असून या सर्वांचे स्वतःच्या तालुक्यात असलेल्या सहकारी साखर कारखान्यावर एकहाती वर्चस्व आहे. यात आता शेतकरी संघटनेनेही आपला पॅनल उभा करून प्रस्थापित साखर कारखानदारां पुढे आव्हान निर्माण केले आहे.

"उत्तर नगर जिल्ह्यातील साखर कारखानदार शेतकऱ्यांना ऊस भावा बाबत न्याय देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरावे लागले", असे मत शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड.अजित काळे यांनी केले आहे. शेतकरी संघटना याबाबत आघाडीवर असल्याचे दिसून येत असून काल (8 जून) सायंकाळी सहा वाजता वाकडी येथील खंडोबा मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

या कार्यक्रमात अ‍ॅड. काळे यांनी," प्रवरेचा गैरव्यवहार उघडकीस आणला तेंव्हा काहींना उकळ्या फुटत होत्या. मात्र,ते त्यांचेच नातेवाईक असल्याचे उघड झाले आहे. शेतकरी संघटना ही कोणाचे हत्यार नाही. शेतकरी हितासाठी शेतकरी संघटना मैदानात उतरत आहे. शेतकरी संघटना गणेश वाचविण्यासाठी निवडणूक लढवत आहे. ती तत्वासाठी लढवत आहे.शेतकऱ्यांना ऊसाचा भाव मिळाला पाहिजे,कामगारांना पगार वेळेवर मिळाला पाहिजे,कारखाना लूट थांबली पाहिजे यासाठी लढवत आहोत."

तसेच पुढे बोलतांना अ‍ॅड. काळे म्हणाले, यांच्या तीन पिढ्या राजकारणात असताना शेतकऱ्यांना न्याय का मिळत नाही.मग तुमची सत्ता काय कामाची. तुम्ही शेतकऱ्यास भाव मिळून देत नाही असा आरोप ऍड काळे यांनी केला.

या कार्यक्रमावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी कारखाना तोट्यात कसा जातो, असा सवाल करून एकत्रित शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. शेतकऱ्यांच्या वीज तोडण्याचे आदेश रद्द करून शेतकऱ्यांना न्याय दिला, छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी कर्जमाफी योजना जाहीर करून ती ऐन वेळी बंद केली होती व शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेपासून वंचित ठेवले होते.

दरम्यान , शेतकरी संघटनेच्या वतीने अ‍ॅड. अजित काळे यांनी जनहित याचिका दाखल करून राज्यातील शेतकऱ्यांना सुमारे ५ हजार ९७५ कोटी कर्ज माफीचा शेतकऱ्याना लाभ मिळवून दिला आहे असे स्पष्ट केले.

या कार्यक्रमात कामगार नेते रमेश देशमुख, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष औताडे, जिल्हा संघटक शिवाजी जवरे, राज्य सचिव रुपेंद्र काले, विलास कदम, निळवंडे कालवा कृती समितीचे नानासाहेब जवरे, शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे, राहाता शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष योगेश मोरे आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Edited by : Rashmi Mane

SCROLL FOR NEXT