Bhanudas Murkute Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhanudas Murkute News : माजी आमदार मुरकुटेंनी सरकारला करुन दिली 'त्या' निर्णयाची आठवण ; म्हणाले...

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : सध्या राज्यात मराठा आरक्षण,दुष्काळी तालुक्यातील भेदभाव आणि नगर-नाशिक धरण समूहातील पाणी जायकवाडीला सोडण्याविषयी एकच रान उठले आहे. मुळात हे विषय राजकीय नसून सामाजिक आणि शेतीविषयक आहेत.मात्र, याला सार्वत्रिकपणे राजकीय रूप देण्यात आले असून यात राजकारण्यांनी आपले मतांचे आणि सत्तेचे सुकाणू बांधले आहेत.

यात जायकवाडी पाण्याच्या प्रश्नावरून नगर - नाशिक विरुद्ध मराठवाडा असे वातावरण संघर्षाचे बनले आहे. जायकवाडीला जाणाऱ्या 2 टीएमसी पाण्याच्या विषयाला आणि शासन निर्णयाची आठवण माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी आता सरकारला करून दिली आहे.

याबाबत भानुदास मुरकुटे (Bhanudas Murkute) यांनी आमदार असताना निळवंडे धरण बिनकालव्याचे व्हावे अशी मागणी केली होती. ती मान्य झाली असती तर बुधवारी पाटपाण्याला मुकावे लागले नसते.निळवंडेच्या पाणीसाठ्यावर श्रीरामपूर, राहुरी व नेवासे तालुक्यांचाही हक्क असल्याने पाणी उपलब्धतेचे दाखले घेवून शासकीय खर्चाने बांधलेले प्रवरा नदीवरील बंधारे,टाकळीभान,मुठेवाडगाव टेलटँकसह ओढ्यांवरील बंधारे,पाझर तलाव यांच्यासाठी शासनाच्या पाणीवाटप निर्णयातील तरतुदीनुसार निळवंडे धरणातील दोन टीएमसी पाणी आरक्षित करावे, अशी मागणी मुरकुटे यांनी केली आहे.

जायकवाडी धरणासाठी भंडारदरा व निळवंडे धरणातून 3.36 टीएमसी पाणी सोडण्याचे निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना मुरकुटे म्हणाले, समन्यायी पाणी वाटप कायदा हा अन्यायकारक आहे. या कायद्यातील तरतूदीमुळे आजची बिकट स्थिती उद्भवली आहे.(Ahmednagar Politics)

भविष्यात भंडारदरा लाभक्षेत्राचा पाणीप्रश्न गंभीर होणार आहे.मी आमदार असताना निळवंडे धरण हे बिनकालव्याचे व्हावे अशी आग्रही मागणी केली होती. पण ती निळवंडेचे लाभधारक असणाऱ्यांच्या राजकीय दबावामुळे मान्य झाली नाही. निळवंडे आपल्या मागणीनुसार बिनकालव्याचे झाले असते तर आपले भागाला 19.05 टीएमसी पाणी उपलब्ध झाले असते असा दावा मुरकुटे यांनी व्यक्त केला आहे.

मुरकुटे म्हणाले, नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार भंडारदरा धरणातून 2 टीएमसी व निळवंडे धरणातून 1.36 टीएमसी असे एकुण 3.6 टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडले जाणार आहे.याशिवाय खरीपासाठी वापर झालेल्या पाणीही हिशोबात धरले जाणार आहे.भंडारदऱ्यातून 2 टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडले जाणार असल्याने आपल्या भागासाठी भंडारदर्‍याचे केवळ 9 टीएमसी पाणी उपलब्ध असणार आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.(Nilwande Dam)

सन 2003 मध्ये समन्यायी पाणी वाटप कायद्याचे विधेयक आले तेव्हा मी आमदार असतो, तर हा कायदा संमत होवू नये यासाठी प्रयत्न केले असते असे मुरकुटे म्हणाले. नुकतेच निळवंडेचे कालवे कार्यान्वित झाले आहेत. या धरणाचे पाणी अकोले,संगमनेर व राहाता तालुक्याला मिळणार असल्याने त्यांना लाभ होईल. तर श्रीरामपूर ,राहुरी वा नेवासा तालुक्यांचे नुकसान होणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT