Pramod Sawant and Rajan Patil
Pramod Sawant and Rajan Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Solapur News : राजन पाटलांना आता थेट गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचीच भाजपात येण्याची ऑफर?

विश्वभूषण लिमये

BJP and NCP : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत हे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. सावंत सकाळीच सोलापुरात दाखल झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर येथील निवासस्थानी भेट दिली.

सावंत यांच्या भेटीमुळे राजन पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. मुख्यमंत्री डॉ.सावंत हे तब्बल एक तास माजी आमदार पाटील यांच्याकडे थांबले. त्यामुळे भेटीत नेमकी काय चर्चा झाली असेल? याबाबत अनेक तर्कवितर्क उपस्थित करण्यात येत आहेत.

या भेटीनंतर डॉ. सावंत माध्यमांशी बोलताना म्हणाले, ''आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन छान वाटले. मंदिर परिसरातील स्वच्छता आणि सुव्यवस्था पाहून मन प्रसन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे स्वच्छ भारत अभियान गावागावात पोहोचले याची प्रचिती या निमित्ताने आली.

सोलापूर जिल्ह्यातील इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणावर झाली आहे. महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार असल्याने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे'', असे ते म्हणाले.

राजन पाटील यांच्या भेटीबाबत बोलताना सावंत म्हणाले, ''राजन पाटील यांच्या घरी खास भेटीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. यावेळी त्यांच्या कुटुंबीयातील सर्वांशी भेट झाली. पाटील यांच्या कुटुंबीयांशी ही माझी वैयक्तिक सदिच्छा भेट आहे.

राजन पाटील हे राष्ट्रवादी विचारसरणीचे म्हणजेच राष्ट्र निर्माण विचारसरणीचे आहेत. पंतप्रधान मोदीजी हे राष्ट्र निर्माणाचे आणि नवभारत निर्मितीच्या विचारसरणीचे आहेत. त्यामुळे राजन पाटील यांना ते विचार निश्चितच आवडतील याची खात्री मला आहे'', असं म्हणत सावंत यांनी राजन पाटलांना एकप्रकारे भाजपात येण्याची ऑफरच दिली.

''डबल इंजिन सरकारच्या काळात राजन पाटील यांच्या मतदारसंघातील जी कामे राहिलेले आहेत ती देखील निश्चितपणे पूर्ण होतील. राजन पाटील यांनी गोव्यात यावे. मी त्यांना यासाठी निमंत्रण देत आहे. गोव्यातील डबल इंजिन सरकारचा विकास पाहण्यासाठी त्यांना निमंत्रण आहे.

गोव्यात मागील 50 वर्षात जो विकास झालेला नाही त्यापेक्षा अधिक विकास मागील दहा वर्षात आम्ही करून दाखवलेला आहे. काँग्रेसने गोव्यात पन्नास वर्षे राज्य केले. मात्र, आमच्यासारखा विकास त्यांना करता आला नाही'', असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.

दरम्यान, डॉ.सावंत यांनी यावेळी ठाकरे आणि शिंदे यांच्यातील राजकीय वादावरही भाष्य केलं. सावंत म्हणाले, ''मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो. त्यांना पार्टीचे चिन्ह आणि नाव मिळाले. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही खऱ्या अर्थाने अलायन्स आहे.

जे निवडणुकांमध्ये एकत्र लढवून आले होते. परत एकत्र आल्याने आनंद आहे. ज्यांच्याकडे काही राहिलेलं नसतं तेच टीका करत असतात. उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीही राहिलेलं नाही त्यामुळे ते टीका करत आहेत'', असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT