Adv Goval Padvi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Goval Padvi Politics: नंदुरबारला 'बदलापूर', आदिवासी अल्पवयीन मुलीच्या हत्येने संताप!

Sampat Devgire

Taloda Trible News: बदलापूरच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त झाला. सरकारने अनेक घोषणा केल्या. मात्र अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याची चिन्हे नाहीत. तळोदा (नंदूरबार) येथे त्याची पुनरावृत्ती झाल्याने आदिवासी रस्त्यावर उतरले.

खरवड (तळोदा) या नंदुरबार जिल्ह्यातील गावात पुन्हा एकदा 'बदलापूर'ची पुनरावृत्ती झाली आहे. अल्पवयीन आदिवासी मुलीची पळवून नेऊन हत्या करण्यात आली. या मुलीवर अत्याचार करण्यात आल्यानंतर तिला जाळून टाकण्यात आले.

या मुलीचा मृतदेह मोड (तळोदा) गावच्या शिवारातील केळीच्या शेतात फेकून देण्यात आला. या घटनेने आदिवासी समाजात तीव्र संताप उसळला आहे. त्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवी आणि विविध राजकीय नेत्यांनी अत्याचार घडलेल्या मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. याबाबत कारवाईसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी खासदार पाडवी यांनी संबंधित घटना अतिशय दुर्दैवी आहे. पोलिस आणि सरकारचा वचक निर्माण होत नाही. त्यामुळे अत्याचार करणाऱ्यांची हिंमत वाढते. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर कडक शासन व्हावे, यासाठी मी स्वतः पाठपुरावा करीन. याबाबत समाजाने शांतता राखावी, असे आवाहन केले.

या घटनेनंतर तळोदा येथे विविध सामाजिक संघटनांनी कॅण्डल मार्च काढला. भगवान बिरसा मुंडा चौकातून या मार्चला सुरुवात झाली. जय आदिवासी ब्रिगेड संघटनेचे विनोद माळी, कालू पाडवी, चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चात शेकडो महिला आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना अल्पवयीन आदिवासी मुली बाबत घडली आहे. संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. सर्व आदिवासी आश्रम शाळा आणि शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे. अशी मागणी यावेळी करण्यात आली.

माजी आमदार उदयसिंग पाडवी, सुहास नाईक, मोहन शेवाळे, तापीबाई माळी, प्रवीण वळवी, मंगलसिंह चव्हाण आदी राजकीय नेत्यांनीही अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून मोर्चातील मागण्यांना पाठिंबा दिला.

बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाले होते. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राज्यभर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्या विरोधात आंदोलन केले. गृहमंत्र्यांच्या राजीनामाची मागणी झाली. त्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क होऊन या घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.

नाशिक धुळे नंदुरबार यांसह राज्यात अशा घटना घडत आहेत. त्याबाबत शासनाच्या स्तरावरून काय उपाययोजना होते, याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तळोदा (नंदुरबार) येथे घडलेल्या घटनेचे पडसाद राजकीय पक्ष आणि आदिवासी संघटनांमध्ये देखील उमटले आहेत.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT