Maharashtra board exam news : राज्यभर कडक बंदोबस्तात, कॉपीमुक्त वातावरणात बारावीची परीक्षा पार पाडण्याचे आदेश असतानाच, पहिल्याच दिवशी शिक्षण व्यवस्थेच्या तोंडावर तमाचा बसावा, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जैतापूर (ता.कन्नड) इथल्या राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात सीसीटीव्हीसमोर मास कॉपीचा, तर अहिल्यानगर नऊ, तर जळगाव जिल्ह्यात चार कॉपी बहाद्दरांवर कारवाईची नोंद घेण्यात आली. तर बारावीची परीक्षासाठी जाताना सोहम काथारे (वय 18) या विद्यार्थ्याचा मुंब्रा-कळवादरम्यान रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाला.
बारावीच्या लेखी परीक्षेला कालपासून सुरवात झाली आहे. कॉपीमुक्त आणि तणामुक्त परीक्षेसाठी शिक्षण (Education) विभागातून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी परीक्षा केंद्रांवर कडक तपासणी, व्हिजिलन्स पथकांची नेमणूक आणि पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) कन्नड तालुक्यातील जैतापूर इथल्या परीक्षा केंद्रावर मास काॅपीचा प्रकार घडला आहे. काही विद्यार्थ्यांकडून एकमेकांच्या उत्तरपत्रिकांकडे पाहून नक्कल केल्याचा प्रकार निदर्शनास आला. परीक्षा केंद्रावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. थेट सीसीटीव्हीसमोर मास कॉपीचा गैरप्रकार घडल्याने संपूर्ण शिक्षण यंत्रणाच हादरली आहे.
दक्षता समितीच्या आदेशानुसार केंद्रसंचालकासह तब्बल 19 जणांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली असून, पहिल्याच पेपरला झालेली ही आजपर्यंतची सर्वात मोठी परीक्षा-संबंधित कारवाई आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर, उपशिक्षणाधिकारी सीताराम पवार यांच्या पथकाने अचानक केलेल्या तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दक्षता समितीच्या निर्देशानुसार सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. एकाच हॉलमध्ये बसलेले विद्यार्थी परस्पर उत्तरांची देवाणघेवाण करत असल्याचे, तसेच बाह्य मदतीचा आधार घेत असल्याचे प्रत्यक्ष आढळले. त्यासोबतच संशयित विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रति तपासण्यात आल्या. त्यामध्ये उत्तरांतील साम्य, बसण्याची रचना आणि हालचालींमधील जुळवाजुळव यावरून हा प्रकार मास कॉपीचाच असल्याचे स्पष्ट झाले.
शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी, ही संपूर्ण कारवाई जिल्ह्यातील गैरप्रकार करणाऱ्या इतर केंद्रांसाठी इशारा आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात असून, परीक्षा प्रक्रियेत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. भविष्यात सर्व परीक्षा केंद्र संचालक, पर्यवेक्षक व यंत्रणेसाठी हा एक धडा आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यात पाचोरा इथं कॉपीची चार प्रकरणे आढळली असून, उर्वरित जिल्ह्यांमध्ये शिक्षण मंडळाला कुठलाही गैरप्रकार आढळून आला नाही. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा इथं केंद्रावर चार कॉपीबहाद्दर आढळून आले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
अहिल्यानगरमध्ये बारावीच्या परीक्षेत पहिल्या दिवशी जिल्ह्यात नऊ विद्यार्थ्यांवर कॉपी केस करण्यात आल्या. पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात काॅपीकेसेचे प्रकार आढळले. 1 हजार 143 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. पाथर्डी तालुक्यात सात कॉपी केस आढळून आल्या. शेवगाव तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांवर कॉपीप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
इयत्ता बारावीची परीक्षा देण्यासाठी जात असताना सोहम काथारे (वय 18) या विद्यार्थ्याचा मुंब्रा-कळवादरम्यान रेल्वेतून पडून मृत्यू झाला. गर्दीने गच्च भरलेल्या मुंबई सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेत सोहम चढला होता; परंतु मुंब्रा-कळवादरम्यान दरवाजात लटकून जाताना तोल जाऊन खारेगाव फाटकाच्या आधी रेल्वे रुळांवर पडून त्याचा मृत्यू झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.