Arjun kokate falicitation at Yeola
Arjun kokate falicitation at Yeola Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`मला राज्यपालांच्या विचारांची कीव येते`

Sampat Devgire

येवला : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshiyari) हे राज्यपाल पदावर बसल्यापासून त्यांनी आरएसएस (RSS) आणि भाजपाचे (BJP) विचार सांगण्याची एकही संधी सोडलेली नाही. खोटे बोल,पण रेटून बोल या आरएसएसच्या मूळ विचारधारेला कोश्यारींनी कायमच गरळ ओकत मत प्रदर्शन केले आहे. मला त्यांची कीव येते असे राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे म्हणाले.

श्री. कोकाटे यांची राष्ट्र सेवा दलाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली. यानिमित्त येवला येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, वास्तविक घटनात्मक पदावर असलेल्या कुणाही अधिकारी-पदाधिकाऱ्यांना भारतीय संविधानाच्या कक्षेबाहेर जाऊन मत प्रदर्शन करता येत नाही. पण कोश्यारीं अनेकदा आधारहीन दर्पोक्ती करीत असल्याने त्यांच्या विचारांची किव येते.

राष्ट्र सेवा दलाच्या राज्याच्या कार्याध्यक्षपदाची धुरा दुसऱ्यांदा सांभाळण्याची संधी मिळाल्यामुळे कोकाटे यांचा तालुका राष्ट्र सेवा दलातर्फे जाहीर सत्काराप्रसंगी प्रा. कोकाटे बोलत होते. अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते संजय पगारे होते.

श्री. कोकाटे म्हणाले, समर्थाशिवाय शिवाजी कोण? असे नादान वक्तव्य करून कोश्यारींनी जनतेच्या भावनांची हेटाळणी केली आहे. वस्तूतः मासाहेब जिजाऊ सोडून शिवरायांचे कोणीही गुरु नव्हते, ही गोष्ट अनेकदा स्पष्ट झाली असतानाही व त्यावर औरंगाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात निकाल दिलेला असतानाही कोश्यारींनी या विषयावर पुन्हा भाष्य करणे ही निषेधार्य बाब आहे.

मासाहेब जिजाऊ यांनी अथक परीश्रम घेऊन शिवाजी महाराजांना केवळ युद्धात निपुण केले नाही, तर लोककल्याणकारी राजा कसा असतो हे सर्व जगाला दाखवून दिले आहे. अशा कर्तृत्ववान राजाच्या कार्याचे श्रेय घेण्यासाठी सनातन्यांनी महाराजांच्या गुरुस्थानी रामदास आणि दादोजी कोंडदेव यांना बसविण्याचा खोटा प्रयत्न अनेकदा करून पाहिला, तथापि ते तोंडावर पडूनही कोश्यारींनी पुन्हा एकदा वर्णवर्चस्व वादाच्या खुळ्या नादाने वक्तव्य केले आहे.

अनेक कार्यकर्त्यांनी प्रा. कोकाटे यांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांचा सत्कार केला. जिल्हा राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष दिनकर दाणे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, प्रा.डॉ. अजय विभांडिक, दयानंद जाधव, शशिकांत जगताप, अकबर तांबोळी, पंडित मढवाई, सुधा पाटील, राजेंद्र बारे, अॅड समीर देशमुख, अझर शहा आदी उपस्थित होते.

गुन्हा दाखल करणार

उच्च न्यायालयाची मानहानी करणाऱ्या महाराष्ट्रच्या राज्यपालांवर खरे तर विनाविलंब फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना या राज्यातून परत पाठविण्याची मागणीही राष्ट्र सेवा दलातर्फे शासनाकडे करणार असल्याचे श्री.कोकाटे यांनी जाहीर केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT