Indurikar Maharaj
Indurikar Maharaj Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

इंदुरीकर महाराज, `तारतम्य ठेवा, नाही तर गयावया करीत पळत फिरावे लागेल`

Sampat Devgire

नाशिक : विज्ञान, कायदा आणि अध्यात्म या तीन भिन्न गोष्टी आहेत. ह. भ. प. इंदूरीकर महाराजांचा (Indurikar Maharaj) याबाबत गोंधळ झालेला आहे. कोरोनाची लस घेणार नाही असे ते म्हणतात. मात्र लोकांसाठी नव्हे तर स्वतःच्या हितासाठी लस घ्या. अन्यथा गर्भसंस्कार प्रकरणात घडले, तसे रडकुंडीला येत, गयावया करीत पळत फिरावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अनिता भामरे (NCP City President Anita Bhamre) यांनी दिला आहे.

याबाबत सौ. भामरे यांनी सोशल मिडीयावर आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, घोटी (नाशिक) येथे इंदुरीकर महाराजांनी मी कोरोना लस घेतली नाही. घेणारही नाही असे वादग्रस्त विधान केले. यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. दिवाळीच्या सणात आम्हा बहिणींना भाऊबीजेला ओवाळणी म्हणून अर्थात स्वतःच्या निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी तरी कोरोना वरील लस टोचून घ्या. अन्यथा अशी अशास्त्रीय भूमिका महागात पडेल.

त्या म्हणाल्या, प्रत्येक मनुष्याची प्रतिकार शक्ती, आकलन शक्ती भिन्न असते. महाराष्ट्रात इंदुरीकरांच्या कीर्तनास मोठी गर्दी जमते. यासंदर्भात कीर्तनाच्या माध्यमातून गावोगावी फिरून देखील मला आजपर्यंत कोरोना झाला नाही. होणारही नाही. कारण माझ्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती जास्त आहे. त्यामुळे मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही असे इंदुरीकर महाराजांचे म्हणणे आहे.

इंदुरीकरांचा विज्ञानापेक्षा आध्यात्मिक अभ्यास जास्त असू शकतो. तरी देखील जागतिक स्तरावर लसीकरणाचे महत्त्व आहे, हे नाकारून चालणार नाही. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतांना आपण समाजाचे काही देणं लागतो, हा विचार मनाशी बाळगून महाराष्ट्रात नव्हेतर देशभरात मानव जातीवर पून्हा कोरोना रोगासारखे संकट उदभवू नये, तसेच स्वतःचे व इतरांचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर आम्हा बहिणींना भाऊबीचेची ओवाळणी म्हणून कोरोना वरील लस टोचून घ्या. अन्यथा गर्भसंस्काराबाबत आपण केलेले विधान आठवा. त्या प्रकरणात जेव्हा कायेदशीर कारवाईचा विषय आला, तेव्हा तुम्ही रडकुंडीला आला होता. अक्षरशः तुम्ही गयावया करीत पळत सुटला होता. हे एव्हढ्या लवकर का विसरता?. पुन्हा ती वेळ येऊ देऊ नका.

...

ह. भ. प. इंदूरीकर महाराजांनी कोरोना लस घेण्याबाबत केलेले विधान अशास्त्रीय व समाजविरोधी आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा व शासनाच्या अद्यादेशाचे त्यात स्पष्ट उल्लंघन झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

-अॅड रंजना गवांदे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संगमनेर.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT