Ashutosh Kale & Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Water Politics in Sinnar : मतदारसंघातील पाण्यासाठी आमदार आशुतोष काळे झाले पाटकरी!

Sampat Devgire

Water Politics of Nashik : पाण्याचे राजकारण आणि महत्त्व किती आहे, याचा अनुभव सध्या शेतकी आणि राजकीय नेते घेत आहेत. पाणीदार नेतृत्व असल्यावर काय होते, याचा अनुभव नुकताच सिन्नरमध्ये आला. कोपरगावच्या पाण्यासाठी आमदार आशुतोष काळे अक्षरशः पाटकऱ्यासारखे कॅनॉलवर थांबून राहिल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळाले. (MLA Ashutosh Kale personaly present at canal while water release)

सिन्नर (Sinner) मतदारसंघातील सहा गावांना निळवंडे धरणातून चारीने पाणी अपेक्षित होते. मात्र, त्याऐवजी कोपरगावला पाणी मिळाले. आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) त्यासाठी स्वतः उपस्थित राहिले. मात्र, उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि खासदार गोडसेंना (Hemant Godse) जलसंपदाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या.

निळवंडे धरणाच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापासूनच राजकारण सुरू आहे. दोन दिवसांपासून त्याचे रोटेशन सुरू झाले आहे. त्यातही मोठा राजकारण सुरू आहे. या रोटेशनमध्ये सिन्नर तालुक्यातील काही गावांचादेखील समावेश होता. मात्र, प्रत्यक्ष पाणी सुरू झाल्यावर ते सिन्नरची गावे कोरडीच राहणार, अशी स्थिती निर्माण झाले आहे.

या धरणाच्या रोटेशनमध्ये रांजणगाव, जवळके भागातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी निळवंडेच्या आवर्तनाची पाणी वळविल्याची चर्चा आहे. आमदार काळे स्वतः तळेगाव येथे रांजणगावकडे पाणी सोडण्यासाठी कालव्यावर उपस्थित होते. या कालावधीत त्यांनी अगदी फोनदेखील स्वीच ऑफ करून ठेवला होता.

आपल्या मतदारसंघातील सर्व गावांना पाणी गेल्यावरच ते कालव्यावरून निघून गेले. जाताना त्यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांना कोपरगावच्या पाण्यासाठी तंबी देत अन्यत्र पाणी वळवू नका, असे बजावल्याची चर्चा आहे.

यंदा पावसाने पाठ फिरविल्याने टंचाईच्या झळा सोसणाऱ्या सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील व निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या सहा गावांतील शेतकऱ्यांसाठी निळवंडे कालव्याला सोडलेले आवर्तन मृगजळ ठरले आहे. संगमनेर तालुक्यातील देवकवठेत पाणी पोहोचल्यावर जलसंपदा विभागाने आवर्तन थांबविले.

त्यामुळे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, खासदार हेमंत गोडसे यांनी उंटावरून शेळ्या हाकत मंत्री व अधिकाऱ्यांना फोन करण्यातच धन्यता मानली. पाणीदार नेतृत्व काय असते, याचा प्रत्यय आमदार काळे यांनी दिला. पाण्याचे राजकारण आगामी काळात आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT