Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackeray : तब्बल 35 वर्षे जळगावचं राजकारण कोळून पिलेल्या नेत्यानं सोडलेली साथ ; उद्धव ठाकरेंना यंदा पालिकेचा गड सोपा नसणार

Suresh Jain not supporting Uddhav Thackeray may impact Jalgaon municipal election outcome : ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेलाच त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच पालिका निवडणुकीतही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सुरेश जैन यांची उणीव बासणार आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon Politics | गेल्या ३५ वर्षांपासून जळगाव महापालिकेवर वर्चस्व असलेल्या माजी मंत्री सुरेश जैन यांचं संस्थान २०१८ च्या निवडणुकीत भाजपने खालसा केलं होतं. जळगावकरांनी कौल दिल्याने भाजपने ५७ जागांवर विजय मिळवत सत्ता खेचून आणली होती. मुख्य लढत शिवसेना व भाजपमध्ये झाली होती. शिवसेनेच्या पदरात केवळ १५ जागा पडल्या होत्या.

सुरेश जैन सोबत असताना भाजपने शिवसेनेची ही अवस्था केली होती. मात्र यावेळी सुरेश जैन हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत नाही. ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेलाच त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. जळगाव मतदारसंघातून भाजपाच्या स्मिता वाघ यांच्यासमोर ठाकरे गटाचे करण पवार हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात करण पवार यांचा पराभव झाला. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सुरेश जैन यांची उणीव बासणार आहे. खासकरुन पालिका निवडणुकीत मोठा फटका बसणार आहे.

सुरेश जैन यांच्या महापालिकेतील वर्चस्वाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सुरुंग लावत भाजपला एकहाती सत्ता मिळवून देण्याची किमया करुन दाखवली. त्यासाठी महाजन यांनी आपलं अस्तित्व पणाला लावलं होतं. पर्यायानं सुरेश जैन विरुद्ध गिरीश महाजन असं स्वरुप निवडणुकीला आलं होतं. विशेष म्हणजे कॉंग्रेस व राष्ट्रवादीला खातही उघडता आलेलं नव्हतं. एमआयएमने ३ जागा जिंकून सर्वांना चकीत केलं होतं.

सुरेश जैन १९७४ पासून ४० वर्षे राजकारणात होते. १९८० पासून राजकारणात प्रवेश केल्यानंतर ३४ वर्षे ते आमदार होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम त्यांना मंत्रिपद दिलं. तत्कालीन जळगाव महापालिकेच्या घरकुल घोटाळ्यात सुरेश जैन यांना साडेचार वर्षे कारागृहात राहावे लागले. कारागृहातून बाहेर आल्यावर प्रकृतीच्या कारणास्तव ते सक्रिय राजकारणातून बाहेर पडले. त्यांनी ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

त्याचवेळी शिवसेनेमुळे मी मोठा झालो, बाळासाहेब ठाकरेंनी मला मंत्री केलं त्याबद्दल आपण ऋणी असून प्रकृतीच्या कारणास्तव पक्ष सोडत असल्याचं सांगितलं होतं. तसेच अन्य कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे गणित लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांपेक्षा वेगळं असतं. येथे स्थानिक राजकारणाला अधिक महत्व असतं. सुरेश जैन यांचा स्थानिक राजकारणात चांगला दबदबा आहे. 35 वर्षात त्यांनी महापालिकेत कार्यकर्त्यांची चांगली फळी उभी केलेली आहे. त्यामुळे जैन सोबत असते तर निश्चितच उद्धव ठाकरेंना बराच फायदा झाला होऊ शकला असता.

पण आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते नाहीत. त्यात आधीच शिवसेनेचे दोन गट पडल्याने स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे जळगाव महानगरपालिकेचा गड सर करताना उद्धव ठाकरेंना जरा जडच जाईल असं म्हणता येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT